प्रकरण तापणार, वाद पेटणार : खा. भुमरेंच्या नोटिसीला अंबादास दानवे उत्तर देणार!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खा. संदिपान भुमरे यांनी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यावर १ कोटींच्या अब्रुनुकसानीच्या दाव्या नोटीस बजावली आहे. या नोटिसीला उत्तर देण्याचा निर्णय दानवे यांनी घेतल्याने, इतक्यात हे प्रकरण शांत होणार नाही, असे दिसून येत आहे. जोगवाडा येथील संपादित जमिनीचा ११५० कोटी रुपये मावेजा लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचे आपण उघडकीस आणले, असे दानवे म्हणाले आहेत. समृद्धी महामार्गासाठी जोगवाडा- जटवाडा येथील संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा लाटण्यासाठी खा. संदीपान भुमरे यांच्या वाहनचालकाने बनावट हिबानामा तयार केल्याचा आरोप दानवे यांनी केला होता. येत्या काही दिवसांत आपण हा हिबानामा सादर करू, असेही ते म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण...
छत्रपती संभाजीनगर शहराजवळील जटवाडा- जोगवाडा भागातील जमीन लता सूर्यभान वाघामारे यांचे खापर पंजोबा दिवंगत पावण्या भिका वाघमारे यांच्या नावे व हक्कात २३ एकर ३० गुंठे जमीन होती. ते या जमिनीचे प्रतिबंधित मालक होते. हैदराबाद संस्थानात ती त्यांना बहाल करण्यात आली होती. १९५७ मध्ये प्रमाणपत्राच्या आधारे बहाल केलेली जमीन त्यांच्या मृत्यूनंतर पडीक होती. ही जमीन पुढे महाराष्ट्र विकास मंडळास संपादीत करून देण्यात आली होती. समृद्धी महामार्गासाठी ही जमीन अधिग्रहित करण्याचे आदेश झाल्यानंतर त्याचे बाजारमूल्य ११५० कोटी रुपये इतके निश्चित करण्यात आले. यातील तीन एकर जमीन कुळ कायद्याने जावेद रसूल शेख यास हिबानामा करून देण्यात आली. ज्याची किंमत १५० कोटी रुपये आहे. जावेद शेख हे खा. भुमरे यांचे वाहनचालक आहेत. १९७१ मध्ये हिबानामा केला आहे. मात्र शेख यांचा जन्म १९८५ असल्याने हा हिबानामा झाला कसा, असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित करून, यामागे कोणाचे हितसंबंध दडले आहेत, याची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व महसूल प्रशासनाकडे केली आहे. तशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत देत खा. भुमरे आणि त्यांच्या चालकावर आरोप केले होते.

खा. भुमरे काय म्हणाले होते...
जावेद माझा वाहनचालक असल्याचे मी नाकारत नाही. मात्र दानवे यांनी माहिती घेऊन आरोप करायला हवे होते. जिल्हा हातातून गेला, आता आमदारही राहिले नाहीत. विरोधी पक्षनेत्याच्या लवाजम्याची सवय होती. तीही गेली. आता त्यांना कुणीही विचारत नाही. त्यामुळे संतुलन बिघडून दानवे खोटे बोलत आहेत. माझ्या चालकाची जन्मतारीख १९८४ आहे आणि हिबानामा १९७१ मध्ये झाला आहे. त्यावेळी जावेद जगातही आला नव्हता. शासकीय यंत्रणेचा गैरवापर झाला असेल, तर प्रकरणाची चौकशी व्हावी. दानवे यांनी केलेल्या आरोपांचे पुराव्यानिशी उत्तर द्यावे. १७४ हा गट क्रमांकच नाही. १५४ गटाचे वाद सुरू आहेत, त्याचा मोबदला (पैसे) कोर्टात जमा आहे. गट फक्त १७१ पर्यंतच आहेत. मग हिबानामा कसा होऊ शकतो? ज्या १५४ गटाचे कोर्टात वाद आहेत, ते लोक वेगळे आहेत, असे भुमरे म्हणाले होते.

वादग्रस्त गटांतील मोबदला कोर्टात जमा
दरम्यान, या प्रकरणासंदर्भात प्रशासकीय सूत्रांनी सांगितले, की जोगवाडामध्ये १७४ गट क्र. आहे. जटवाडामध्ये ८९ गट नंबर आहे. गटांचे एकत्रीकरण झाल्यानंतर जुन्या गटांचे अस्तित्व संपले. महिलेने खापरपणजोबांच्या नावाचे पेपर दाखविले; परंतु त्यांचा सातबारा तेव्हा व सध्या कुठेही आढळत नाही. तिने १५४ गटातील मोबदल्यावर आक्षेप घेतला होता. समृद्धीतील भूसंपादनात काही सातबाराचे वाद होते. त्याची रक्कम कोर्टात आहे, असे प्रशासकीय सूत्रांचे म्हणणे आहे. मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतून ११२ किलोमीटर जातो. या अंतरातील भूसंपादनासाठी सुमारे १६०० कोटींचा मोबदला सरकारने दिला आहे. काही वादग्रस्त गटांतील मोबदला कोर्टात जमा आहे. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी

Latest News

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने ३ भावांवर सशस्त्र हल्ला चढवला. दोघांना चाकूने भोसकून...
३०० कोटी खर्चून झालेली १०६ सिमेंट रस्त्यांची कामे बोगस?; सरफेस खराब, खडी येतेय बाहेर, २३० कोटी घेतल्यानंतर कंत्राटदार दुरुस्तही करून देईना!!, छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटीची अस्मार्ट कामे...
राम जन्मभूमीसाठी करोडो लोकांच्या आस्थेचा प्रश्न, महाबोधी महाविहारासाठी म्हणतात पुरावे दाखवा!; भीमराव आंबेडकर यांची न्याय व्यवस्थेवर टीका
वैजापूरच्या धरणात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
प्रकरण तापणार, वाद पेटणार : खा. भुमरेंच्या नोटिसीला अंबादास दानवे उत्तर देणार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software