जायकवाडी धरण तुडूंब भरताच विसर्ग सुरू, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन

On

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : गोदावरी खोरे हे सर्वात मोठे खोरे असून समुद्रात वाहून जाणारे पाणी वळवून या खोऱ्यात आणण्यासाठी माझ्या वडिलांनी प्रयत्न केले. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आपण सगळे मिळून हे काम करू आणि गोदावरी खोरे सुजलाम सुफलाम करू, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज, ३१ जुलैला पैठण येथे केले. धरणाचे १८ दरवाजे ०.५ फूट उचलून ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदापात्रात सुरू करण्यात आला आहे. पुढील काही तासांत विसर्गाचे प्रमाण वाढवला जाण्याची शक्यता आहे.

जायकवाडी धरण तुडूंब भरल्याने, सतत वाढणाऱ्या पाणीपातळीमुळे आज नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करून विसर्ग सुरू करण्यात आला. नाथसागर जलाशय येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास आ. रमेश बोरनारे, आ. विलास भुमरे, आ. हिकमतदादा उडान ,आ. विठ्ठलराव लंघे, आ. विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, अधीक्षक अभियंता प्रशांत संत, मुख्य अभियंता सुनंदा जगताप, मुख्य अभियंता अरुण नाईक, मुख्य अभियंता राजीव मुंदडा, अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, शाखा अभियंता मंगेश शेलार, तहसीलदार ज्योती पवार, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे आदी उपस्थित होते.

526205548_1084119957152366_37146 (1)

या वेळी विखे पाटील म्हणाले, की स्व. शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून जायकवाडी प्रकल्प साकारला. यंदा निसर्गाची कृपा झाली आणि याच महिन्यात धरण भरले. संत ज्ञानेश्वर उद्यान पीपीपी मॉडेलवर विकसित करणार असून, तेथे वॉटर स्पोर्ट्‌स, अत्याधुनिक संकल्पना विकसित करू. हा प्रकल्प इथल्या भागासाठी वरदान ठरेल. त्यामुळे पर्यटन विकास होईल. संत एकनाथांच्या भूमीत संत ज्ञानेश्वर उद्यान करणे हे मोलाचे काम होय. याशिवाय १२ मेगा वॅट हायड्रो इले. प्रोजेक्ट, फ्लोटिंग सोलर प्रकल्प अशा विविध प्रकल्पांना चालना देण्यात आली आहे. ब्रह्म गव्हाण उपसा सिंचन योजनेसाठी १५० कोटी दिले असून एक वर्षात ही योजना पूर्ण करणार आहे. जलाशयांचा गाळ काढून त्यांची क्षमता वाढविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक आ. विलास भुमरे यांनी केले. त्यांनी जल प्रकल्याचे पाणी बंदिस्त पाईप लाईनद्वारे द्यावे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ते करावे. ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना, संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी निधी द्यावा, अशी मागणी मांडली. सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले.

बालपणीच्या आठवणीत रमले मंत्री विखे पाटील...
आठवणींना उजाळा देत विखे पाटील म्हणाले, की मी या प्रकल्पाचा लहानपणापासून साक्षीदार आहे. येथून जवळ असलेले खिर्डी हे माझ्या बहिणीचं गाव. तो पाण्यासाठीचा संघर्षाचा काळ होता. मी लहान होतो. बहिणीकडे इथं पैठणला मी येत असे. आमच्या आजोबांचा अमृत महोत्सवी सत्कार याच धरणावर स्व. इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाला होता. मी कृषी महाविद्यालयात शिकत असताना सायकलीवर धुळ्याहून इथं संत ज्ञानेश्वर उद्यान येथे आलो होतो, अशीही आठवण विखे पाटील यांनी सांगितली.

जलसाठा आणि विसर्ग
सध्या धरणात ९०.१३ टक्के पाणीसाठा आहे. धरणाची सध्याची पाणी पातळी १५२०.१८ फूट आहे. धरणाचा एकूण जलसाठा २६९४.७७६ दलघमी असून १९५६.६७ दलघमी जिवंत साठा आहे. धरणाच्या विसर्ग नियमावलीनुसार सध्या १८ दरवाजे अर्धाफूट उघडून ९४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. सद्यस्थितीत धरणात १६२३० क्युसेक इतकी पाण्याची आवक आहे. सध्या धरण तुडूंब भरले असून दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात येत आहे. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या छोट्या मोठ्या धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे.  धरणातून होत असलेल्या पाणी विसर्गामुळे नदीच्या काठावरील गावांमध्ये नागरिकांनी, शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आक्रमक होऊन शेतकऱ्यांची घोषणाबाजी
पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचे साखर कारखान्यांकडे थकीत असलेले ऊसाचे पैसे तात्काळ मिळावेत, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी मंत्री विखे पाटील यांच्यासमोर घोषणाबाजी केली. विखे यांना मागण्यांचे निवेदन दिले. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडको एन ५ मधील स्काय ब्लू कॅफेवर हल्ला!; कॅफेचालक दोन्ही भावांवर चाकू, लोखंडी रॉडने वार, तिघे गंभीर

Latest News

सिडको एन ५ मधील स्काय ब्लू कॅफेवर हल्ला!; कॅफेचालक दोन्ही भावांवर चाकू, लोखंडी रॉडने वार, तिघे गंभीर सिडको एन ५ मधील स्काय ब्लू कॅफेवर हल्ला!; कॅफेचालक दोन्ही भावांवर चाकू, लोखंडी रॉडने वार, तिघे गंभीर
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ५ मधील गुलमोहर कॉलनीतील स्काय ब्लू कॅफेवर ३ टवाळखोरांनी हल्ला केला. कॅफेचालक दोन्ही...
कुटूंब दावतला जाताच चोरट्यांनी केले घर साफ!, बायजीपुऱ्यातील घटना 
ऐन तरुण वयात सारखे तब्येतीचे प्रॉब्‍लम्स, सर्व उपचार करून झाले होते... एकेदिवशी या कार्यशाळेत आली अन्‌ स्वतःमध्ये अनुभवले चमत्कारिक बदल!, छ. संभाजीनगरात होत असते की ‘ही’ कार्यशाळा!!
शताब्‍दीनगरात राडा : दोन भावांवर तलवारीचे वार, पोलिसांनी धावून गंभीर जखमींना केले घाटीत दाखल
दोघांना घरात कोंडले, लोक यायचे अन्‌ मारहाण करून जायचे!; धावणी मोहल्ल्यात काय घडलं, मोहम्मदने तक्रारीत मांडलं...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software