- News
- सिटी क्राईम
- Full Story : वाळूज MIDC तील तरुणीच्या खुनाची भयंकर कहानी : तू दुसरं लग्न केलं, मग मी का नको... नंदिन...
Full Story : वाळूज MIDC तील तरुणीच्या खुनाची भयंकर कहानी : तू दुसरं लग्न केलं, मग मी का नको... नंदिनीचा हट्ट, कन्नडच्या तरुणासोबत प्रेमप्रकरण...आईने नळीने गळा आवळून केली हत्या...!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पतीशी पटत नसलेल्या २१ वर्षीय तरुणीचे कन्नडच्या तरुणाशी सूत जुळले... मात्र या प्रेमप्रकरणाला तिच्या आईचा विरोध होता. तरीही तरुणी दुसरा विवाह करण्यावर ठाम असल्याने संतापलेल्या आईने तिचा प्लास्टिकच्या नळीने गळा आवळला आणि हत्या केली. नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गावी नेत असतानाच रिक्षाचालकाच्या सतर्कमुळे त्यांचे बिंग फुटले आणि पोलिसांनी पकडले... पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत खुनाची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीत गुरुवारी (१९ फेब्रुवारी) दुपारी १ च्या सुमारास घडली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तरुणीची आई, सावत्र पिता आणि मामा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
नंदिनीचे लग्न ३ वर्षांपूर्वी झाले होते. मात्र पतीशी पटत नसल्याने ती आईकडेच राहत होती. अलीकडील काळात तिचे कन्नडच्या एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. त्याच्यासोबत ती लग्न करण्यासाठी हट्ट धरून होती. मात्र तिची आई भारती साबळे हिला हे मान्य नव्हते. भारतीचेही पहिले लग्न झालेले असून, नंदिनी ही तिला पहिल्या पतीपासून झालेली होती. दुसरा पती उमेश साबळे याच्यापासून तिला २ मुले झाली. नंदिनी, दुसरा पती आणि त्याच्यापासून झालेली २ मुले असे हे कुटुंब वडगाव कोल्हाटीत घर भाड्याने घेऊन राहत होते. तू दुसरे लग्न केले, मग मी का दुसरे लग्न करू नको, असा प्रश्न नंदिनी आईला करायची. यातून तिच्या आईचा संताप अनावर झाला...
...अन् संधी साधली!
कुटुंबाची बदनामी होईल, समाजात काय बोलले जाईल, अशी भीती भारतीला होती. परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या घरातून सतत भांडणाचे आवाज येत होते. मात्र, हा वाद इतका टोकाला जाईल याची कल्पना कुणालाही नव्हती. घटनेच्या दिवशी १९ फेब्रुवारीला दुपारी १ च्या सुमारास भारती व नंदिनी दोघीच घरी होत्या. उमेश व त्यांचा मोठा मुलगा कामासाठी बाहेर गेलेले होते. लहान मुलगा खेळायला गेला होता. भारती व नंदिनीत वाद सुरू झाला. त्यानंतर नंदिनी अंघोळीसाठी घरातील बाथरूममध्ये गेली.

अंघोळ करताना खाली बसलेली असताना भारती पाणी पिण्याच्या नाटक करून जवळ गेली. तेथे असलेल्या प्लास्टिकच्या नळीने नंदिनीचा गळा आळवायला सुरुवात केली. काही क्षणांतच नंदिनी गतप्राण झाली. त्यानंतर भारतीने पती उमेश व भाऊ अमोलला हत्येबद्दल सांगितले. दोघे घरी आले. त्यांनी भारतीला म्हटले, की तू पोलीस ठाण्याला काही सांगू नको. आपण नंदिनीला कन्नड येथील आपल्या शेतात पुरून टाकू. यासाठी तिघांनी मिळून नंदिनीचा मृतदेह गादीत दोरीने बांधला. त्यानंतर उमेशने रिक्षा भाड्याने मागवला. घरसामान घेऊन जायचे सांगून रिक्षात मोकळे पाण्याचे ड्रम, गादीत बांधलेला मृतदेह घेऊन रात्री ९ ला कन्नडकडे निघाले...
रिक्षाचालकाच्या सतर्कमुळे फुटले बिंग...
रिक्षाचालकाला संशय आल्याने त्याने तिसगाव चौफुली येथील पुलाजवळ भारती व उमेश यांना त्यांच्या सामान व गादीसह खाली उतरवून दिले आणि पोलिसांना कळवले. त्यानंतर लगेचच तिथे धाव घेतली. भारती व उमेशकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी गादी सोडून पाहिली असता त्यात नंदिनीचा मृतदेह दिसला. त्यावर भारतीने पोलिसांकडे बनवाबनवी सुरू केली, की तिने प्रेमप्रकरणातून फाशी घेऊन आत्महत्या केल्याने अंत्यविधीसाठी गुपचूप गावाकडे नेत आहोत. मात्र प्रकरणात काळेबेरे असल्याचा संशय वाढल्याने पोलिसांनी भारती व उमेशला ताब्यात घेत नंदिनीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात आणला. डॉक्टरांनी उत्तरीय तपासणी अहवालात गळा आवळून खून झाल्याचे सांगितले.
त्यामुळे पोलिसांनी भारती आणि उमेशकडे कसून चौकशी केली असता तिने खुनाचा घटनाक्रम सांगितला. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यांच्या पथकात पोलीस अंमलदार राजाराम वाघ, संदीप तागड, समाधान पाटील, नितीन इनामे, जयेश साळुंखे, हनुमान ठोके, वैभव गायकवाड, सुहास मुंडे, गजानन कसबेवाड, लखन गुसिंगे आणि शिव नागरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मोबाइल कॉल रेकॉर्ड, नातेसंबंधांची पार्श्वभूमी आणि घटनास्थळावरील पुरावे यांची सखोल तपासणी सुरू असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

