भाजप-शिंदे गटाची पहिली बैठक, अजित पवार गट-रिपाइंला बोलावलेच नाही, महायुती करण्यावर सकारात्मकता, जागा वाटपाचा वाद टाळला..!, बैठकीनंतर कोण काय म्हणालं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने काही उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ते वेगळी चूल मांडणार असल्याचे दिसत आहे. परिणामी भाजप-शिंदे गटाने त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मंगळवारी (१६ डिसेंबर) बैठकीला बोलावले नाही. रिपाइं आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनाही पहिल्या बैठकीचे नियंत्रण नव्हते. पहिल्या बैठकीनंतर आता मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांची स्वतंत्र बैठक होणार आहे. बैठकीनंतर महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे.

कोकणवाडी चौकातील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. पहिल्याच बैठकीत वाद नको म्हणून जागांबद्दल चर्चा करण्याऐवजी प्रभागांतील स्थिती, बदल यावर चर्चा झाली. बैठकीला शिंदे गटाकडून आ. प्रदीप जैस्वाल, ऋषिकेश जैस्वाल, राजेंद्र जंजाळ तर भाजपकडून शहराध्यक्ष किशोर शितोळे, माजी महापौर बापू घडामोडे, प्रशांत देसरडा, समीर राजूरकर उपस्थित होते. आज किंवा उद्या पुन्हा बैठक होणार आहे. अजित पवार गटाला सोबत घेण्यावरून किशोर शितोळे म्हणाले, की अजित पवार गटाकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना दोन दिवसांपूर्वी मुस्लिम बहुल प्रभागातून उमेदवार देण्याचे सूचवले होते. बैठकीत महायुतीतच निवडणूक लढायची असे ठरले. सामाजिक समिकरणांवरही चर्चा झाली, असे शितोळे म्हणाले.

राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले, की जागा वाटपाचा निर्णय समन्वयाने होईल. पुढील दोन दिवसांत बैठका होतील. अजित पवार गटाने एक-दोन उमेदवार जाहीर केले असून, त्यांच्या डोक्यात दुसरा काही विचार असेल, असेही जंजाळ म्हणाले. दरम्यान, अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी मात्र पहिल्या बैठकीचे निमंत्रण नव्हते, असे म्हटले आहे. विधानसभेत त्यांच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या मेहनतीचे फळ असे देत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. रिपाइंच्या आठवले गटाचे शहराध्यक्ष नागराज गायकवाड यांनी सांगितले, की पहिल्या बैठकीला आम्हालाही बोलावले नव्हते. त्यांना आम्हाला सोबत घ्यायची इच्छा नसेल तर आम्‍ही उमेदवार जाहीर करू. बुधवारी (१७ डिसेंबर) आमच्या पक्षाची बैठक होत आहे, असे ते म्हणाले.

राजू वैद्य महायुतीच्या गळाला लागणार?, ठाकरे गट पुन्हा फोडण्याचा प्रयत्न...
ठाकरे गटाला पुन्हा एकदा भगदाड पाडण्याचा मनसुबा भाजप-शिंदे गटाने रचला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी थेट महानगरप्रमुख राजू वैद्य यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र वैद्य यांनी आपण ठाकरे गटातच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात आ. अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील वर्चस्वस्वाद उफाळून आला आहे. दानवेंचे खैरे ऐकत नाहीत, तर खैरेंनी सूचवलेले उमेदवार दानवे यांना मान्य नाहीत, असे बोलले जात आहे. अशा स्थितीत ठाकरे गटाकडे निवडणूक रणनीतीकार म्हणून जे पदाधिकारी काम करत आहेत त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न भाजप-शिंदे गटाकडून सुरू आहेत. यात प्रामुख्याने महानगरप्रमुख राजू वैद्य यांचे नाव समोर आले आहे. ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सातत्याने भाजप, शिंदे गटात प्रवेश करत आहेत. मंगळवारीही काही माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. पक्षाला लागलेली गळती आणि अभ्यासू चेहरे नसल्याने बहुतांश प्रभागांत नाइलाजाने उमेदवारी देण्याची वेळ ठाकरे गटावर आली आहे. दरम्यान, राजू वैद्य यांनी महायुतीचे नेते संपर्क साधत असल्याची कबुली दिली. मात्र आपण ठाकरे गटातच राहणार असल्याचे निःक्षून सांगितले.

ठाकरे गट स्वतंत्र लढण्याची शक्यता...
दरम्यान, काँग्रेसने महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला सोबत घेण्याबाबत प्रतिकूलता दर्शवली आहे. काँग्रेसला ठाकरे गटापेक्षा वंचित बहुजन आघाडी आघाडीसाठी फायदेशीर वाटत असून, शहराध्यक्ष शेख युसूफ यांनी वंचितसोबत आघाडीचा प्रस्ताव मुंबईत झालेल्या शहराध्यक्षांच्या बैठकीत वरिष्ठांकडे मांडला आहे. दरम्यान, काँग्रेससोबत अद्याप कुठलीही चर्चा नाही. ते स्वतंत्र निवडणूक लढवू इच्छित असल्यास आमचीही तयारी आहे, असे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. 

रिपाइंमध्ये पक्ष चिन्हाचा संभ्रम...
दरम्यान, महापालिका कोणत्या निवडणूक चिन्हावर लढायची याबद्दलचा रिपाइंतील संभ्रम कायम आहे. रिपाइंने निवडणूक आयोगाकडे ऊस उत्पादक शेतकरी हे चिन्ह मागितले आहे. मात्र निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय दिलेला नाही. त्यामुळे भाजपच्या कमळावर लढायचे की अन्य चिन्ह मिळणार, याबद्दल रिपाइंच्या इच्‍छुकांना प्रश्न पडला आहे. तूर्त भाजपकडे रिपाइंने १५ जागा मागितल्या आहेत. मात्र महायुतीच्या पहिल्या बैठकीला रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात न आल्याने रिपाइं नाराज आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...

Latest News

दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले... दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर येथे सोमवारी (२ मार्च) सायंकाळी होळी पूजन झाले. त्यानंतर...
प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
हिंदू मुलीची धर्मांधाच्या ताब्यातून ४८ तासांत सुटका!; पैठणहून केले होते अपहरण, नवी मुंबईत आवळल्या मुसक्या!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software