- News
- एक्सक्लुझिव्ह
- EXCLUSIVE : छत्रपती संभाजीनगरच्या ‘अन्नामृत’ची करामत... ४० हजार बालकांची रोज ‘अंगत पंगत’!, कसे चालते...
EXCLUSIVE : छत्रपती संभाजीनगरच्या ‘अन्नामृत’ची करामत... ४० हजार बालकांची रोज ‘अंगत पंगत’!, कसे चालते या संस्थेचे कार्य, कुठून येतो इतका निधी, जाणू सर्व...
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अन्नामृत फाऊंडेशन ही इस्कॉन अंतर्गत काम करणारी संस्था सामूहिक स्वयंपाक घराद्वारे आजघडीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (प्रामुख्याने शहरातील) ४० हजार बालकांपर्यंत शालेय पोषण आहार पोहोचविण्याचे काम करते. त्यामुळे दररोज ४० हजार बालकांची शाळा, शाळांमधून ‘अंगत-पंगत’ घडविण्याची कामगिरी अन्नामृत फाऊंडेशन करीत आहे.
१६८ शाळा आणि ८० बालवाड्यांमध्ये पोहोचविला जातो आहार
छत्रपती संभाजीनगरच्या सिडको भागात ‘अन्नामृत’चे स्वयंपाक गृह आहे. ‘इस्कॉन’तर्फे देशात असे २० स्वयंपाक गृह चालविले जातात. त्यातील एक छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. हे स्वयंपाकगृह १६८ शाळांमध्ये (प्रामुख्याने शहरी भागात) सुमारे ३८ हजार विद्यार्थी व ८० बालवाड्यांमधील ३५०० बालकांपर्यंत आहार पोहोचवितात.
अत्याधुनिक स्वयंपाक घर
‘अन्नामृत’चे स्वयंपाक घर हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बनविलेले स्वयंपाक घर आहे. या स्वयंपाक घरात अन्न बनविण्यासाठी थर्मल इन्स्युलेटर तंत्राचा वापर करण्यात येतो. त्यामुळे स्वयंपाक घरात जाळ, धूर विरहित उष्णतेद्वारे अन्न शिजविले जाते.
.jpg)
अन्न पोहोचविण्यासाठी सुरक्षित कंटेनर्स
शिजवलेले अन्न मुलांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठ्या कंटेनर्सचा वापर केला जातो. त्यासाठी प्रत्येक डब्ब्याला सिल करून त्या सिलचा कलर कोड दिला जातो. त्यानुसार त्या डब्ब्यात काय पदार्थ आहे हे शाळेचे मुख्याध्यापक ओळखू शकता. एकूण १४ वाहनांद्वारे हे अन्न पोहोचविले जाते. शिवाय ज्या वाहनाद्वारे हे अन्न पोहोचविले जाते, त्या प्रत्येक वाहनाचे जीपीएस ट्रॅकींग केले जाते. स्वयंपाक घरातून निघालेले वाहन हे रस्त्यात वाहतूक सिग्नल व्यतिरिक्त कुठेही थांबवता येत नाही. थांबते ते थेट शाळेतच. त्यामुळे वेळेवर आणि कमीत कमी वेळात अन्न पोहोचविता येते.
.jpg)
पोषणयुक्त आहार
संस्थेच्या आहार बनविण्याच्या वेळापत्रकात व्हेज पुलाव, व्हेज खिचडी, मुगडाळ खिचडी, चना खिचडी, चना पुलाव, मटर पनीर भात, मटकी, सोयाबीन पुलाव, शेवग्याचे मुगडाळीचे वरण, भात याशिवाय चिक्की, खजूर अशा पोषणयुक्त आहाराचा समावेश केला जातो. जेणेकरून बालकांना रोज वेगळ्या चवीचे पदार्थ खायला मिळतील व पोषणयुक्त आहारही. त्यासाठी नवनवीन पदार्थ्यांचा व अन्न घटकांचा समावेश आहारात केला जातो, असे व्यवस्थापक सुदर्शन पोटभरे यांनी सांगितले.
.jpg)
मटर पनीर डिश आणि मान्यवरांचा सहभाग
आज टोफू पनीरचा वापर करून मटर पनीर डिश बनवण्यात आली. मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे, काळे ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक अंकित काळे, कायगाव पेपर मिलचे चेअरमन प्रकाश राठी, अलाइंड पॅकेजिंग कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक रविशंकर खानापुरे, महिको समूहाचे वरिष्ठ व्यवस्थापक मिलिंद करंजीकर या मान्यवरांनी विद्यार्थ्यांसोबत पोषण आहाराचा आस्वादही घेतला. याप्रसंगी राजन नाडकर्णी, अन्नामृतचे सुदर्शन पोटभरे यांनी उपस्थितांना माहिती दिली. जिल्हा परिषद शाळा वरझडी तालुका छत्रपती संभाजीनगरचे मुख्याध्यापक अंकुश चव्हाण, मनपा शाळा नारेगाव येथील प्रतिनिधी विद्यार्थी व शिक्षक देखील उपस्थित होते.
सहयोगी घटकांचा सहभाग
या प्रक्रियेत सहयोगी घटकांचा सहभाग घेतला जातो. जे दाते या प्रकल्पाला मदत करतात त्यांच्या नियमित भेटी आयोजित करून त्यांना अन्न शिजविण्याची सर्व प्रक्रिया दाखविली जाते. अन्न पदार्थ हाताळणी, पॅकींग, पार्सल रवाना अशा सर्व टप्प्यांबाबत माहिती दिली जाते. याशिवाय जे विद्यार्थी हे अन्न प्रत्यक्ष खातात त्यांनाही ‘माझं जेवण कसं बनतं?’ हे जाणून घेण्यासाठी गटागटाने विद्यार्थ्यांच्याही भेटी आयोजित करून त्यांना संतुलित आहाराबाबतही माहिती दिली जाते.

