- News
- सिटी क्राईम
- ‘नॉर्मल’ म्हणून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णाचा दोन तासांत मृत्यू!; घाटी रुग्णालयाच्या डॉक्टरांवर हलगर्ज...
‘नॉर्मल’ म्हणून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णाचा दोन तासांत मृत्यू!; घाटी रुग्णालयाच्या डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : घाटी रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. छातीत दुखत असल्याने शनिवारी (१३ डिसेंबर) पहाटे ४ च्या सुमारास प्रकाश तुळशीराम गायकवाड (वय ४२, रा. हर्सूल) यांना कुटुंबीयांनी घाटीत आणले होते. ऑन ड्युटी डॉक्टरने तपासणी करून ईसीजी काढला, रक्तदाब तपासला. नॉर्मल असल्याचे सांगत गोळ्या लिहून देत ॲडमिट करून घेण्याऐवजी रुग्णाला घरी घेऊन जाण्यास सांगितले. मात्र रुग्णाच्या छातीत दुखणे, अस्वस्थता होती. घरी गेल्यानंतर पुन्हा छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यामुळे सकाळी ७ ला पुन्हा घाटी रुग्णालयात आणले असता रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाइक संतप्त झाले. त्यांनी उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात घाटी प्रशासनाने ५ डॉक्टरांची चौकशी समिती नेमली असून, ८ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दावा केला, की रुग्णाचा बीपी नॉर्मल होता. ईसीजीदेखील नॉर्मल होता. त्यानंतर छातीतीत दुखणे कमी करण्याचे इंजेक्शन दिले. ॲसिडिटी कमी करण्याची गोळी दिली. रुग्ण नॉर्मल वाटल्यामुळे डिस्चार्ज दिला. मात्र त्यांना पुन्हा आणल्यानंतर त्यांचा अगोदरच मृत्यू झालेला होता. नवीन ईसीजी मशीन १५ दिवसांपूर्वीच आणलेली असल्यामुळे सेटिंग करताना चूक झालेली आहे. मात्र, रुग्णासमोरच तो ईसीजी काढलेला असून त्यांना लगेच दिला, असा दावा त्यांनी केला.

