- News
- सिटी क्राईम
- कपिलच्या हत्येला वेगळे वळण!; मास्टरमाइंड रांजणगाव शेणपुंजीचा उपसरपंच असल्याचा कुटुंबीयांचा आरोप, प...
कपिलच्या हत्येला वेगळे वळण!; मास्टरमाइंड रांजणगाव शेणपुंजीचा उपसरपंच असल्याचा कुटुंबीयांचा आरोप, पोलीस कर्मचाऱ्यावरही गंभीर आरोप, तपास आता शहर गुन्हे शाखा करणार
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हॉटेलचालक कपिल सुदाम पिंगळे (वय ३३, रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी) या तरुणाच्या खुनाचा तपास आता शहर गुन्हे शाखेने हाती घेतला असून, सहायक आयुक्त धनंजय पाटील यांच्यापुढे खुनाची सुपारी देणाऱ्या मास्टरमाइंडचा शोध लावण्याचे आव्हान आहे. कपिलचा १८ जुलैच्या मध्यरात्री जयेश उर्फ यश संजय फत्तेलष्कर (वय २४, रा. बेगमपुरा) याने त्याचे […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हॉटेलचालक कपिल सुदाम पिंगळे (वय ३३, रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी) या तरुणाच्या खुनाचा तपास आता शहर गुन्हे शाखेने हाती घेतला असून, सहायक आयुक्त धनंजय पाटील यांच्यापुढे खुनाची सुपारी देणाऱ्या मास्टरमाइंडचा शोध लावण्याचे आव्हान आहे.
दरम्यान, या प्रकरणात लोकस्वराज्य आंदोलन संघटनेतर्फे गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप करण्यात आले. कपिलच्या कुटुंबीयांनी हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड शिवराज ठोंबरे असल्याचा आरोप केला. पोलीस कर्मचारी अविनाश ढगे याचाही हात असल्याने दोघांना सहआरोपी करून अटक करण्याची मागणी करण्यात आली. कपिल हा ठोंबरेकडे कामाला होता. मात्र काही वर्षांपासून त्याने काम सोडले होते. तो शिंदे सेनेत सहभागी झाला होता. ठोंबरे रांजणगाव शेणपुंजीचा उपसरपंच आहे. पोलीस कर्मचारी ढगेसोबत पार्टनरशीपमध्ये तो अवैध धंदे चालवतो. वर्चस्ववादातून कपिलची हत्या करण्यात आल्याचा आरोप कपिलच्या कुटुंबीयांनी केला. या प्रकरणात तपास योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. ठोंबरे व ढगे यांना ५ ऑगस्टपर्यंत अटक न केल्यास मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
घटनेची पार्श्वभूमी…
वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटीत शुक्रवारी (१९ जुलै) पहाटे साईबाबा चौकात कपिलचा मृतदेह आढळला होता. खुन्याने पाठीत घातलेली गोळी छातीतून बाहेर निघाली होती. कपिल मूळचा नांदेड जिल्ह्यातील कारेगावचा (ता. धर्माबाद) आहे. कपिलचे वडील वडील रोजगारासाठी वाळूज एमआयडीसीत येऊन पुढे रांजणगाव शेणपुंजीत स्थायिक झाले होते. कपिलचे लॉज- हॉटेल आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असायचा. कपिलची हॉटेल काही दिवसांपासून बंद होती. कपिलला यशने गुरुवारी रात्री भेटायला बोलावले. कपिलसोबत यश व त्याच्या ३ मित्रांनी एका हॉटेलमध्ये जेवण केले. मध्यरात्री कपिलला घरी सोडण्याचा बहाणा करून रांजणगावच्या दिशेने कारमधून सारे निघाले. कारमध्ये सुपारी दिल्याच्या कारणावरून यशने कपिलसोबत वाद सुरू केला. विकासने कपिलला मारहाण केली. यशने त्याच्याजवळ असलेल्या गावठी पिस्तुलाने कपिलच्या खांद्याजवळ गोळी झाडली, तर सागने चाकूने कपिलवर १७ वार केले. मोठा रक्तस्त्राव होऊन कपिल कारमध्येच निपचित पडला. तो मरण पावल्याची खात्री झाल्यावर चौघांनी वडगाव कोल्हाटीच्या खदानीजवळ मृतदेह टाकून दिला. कपिल व यश दोघेही गुन्हेगार होते. पूर्वी चांगले मित्र होते. काही दिवसांपासून दोघांत खटके उडत होते.

