- Marathi News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- मोठी बातमी! मंगळवारी दुपारी ४ पर्यंत मुंबईचे रस्ते रिकामे करा, मुंबई उच्च न्यायालयाचे मराठा आंदोलकां...
मोठी बातमी! मंगळवारी दुपारी ४ पर्यंत मुंबईचे रस्ते रिकामे करा, मुंबई उच्च न्यायालयाचे मराठा आंदोलकांना निर्देश
.jpg)
मुंबई (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षण आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयाने आज, १ सप्टेंबरला म्हटले, की मनोज जरांगे यांचे आंदोलन शांततेत नाही. त्यात सर्व अटींचे उल्लंघन करण्यात आले आहे. मुंबईत सामान्य स्थिती पूर्ववत करण्याचे आवाहन करत जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना मंगळवारी दुपारपर्यंत परिस्थिती सुधारण्याची आणि सर्व रस्ते रिकामे करण्याची संधी दिली आहे.
न्या. रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर विशेष सुनावणी घेतली. त्यांनी सांगितले, की आझाद मैदानावर आंदोलन करण्याऐवजी आंदोलक दक्षिण मुंबईतील अनेक महत्त्वाच्या भागात पसरले आहेत. यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत होत आहे. ही परिस्थिती गंभीर आहे आणि मुंबई शहर जवळजवळ ठप्प झाले आहे. न्यायालयाने असेही म्हटले की आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), चर्चगेट रेल्वे स्टेशन, मरीन ड्राइव्ह आणि हायकोर्टसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जमले आहेत. यामुळे सामान्य लोकांना त्रास होत आहे.
न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की हे आंदोलन शांततेत नाही. जरांगे आणि इतर निदर्शकांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांना आझाद मैदानावर शांततेत आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती, परंतु त्यांनी तसे केले नाही.
मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातून १० टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी जरांगे यांची आहे. जरांगे यांनी सोमवारपासून पाणी पिणेही बंद केले आहे.
रस्ते अडवले, शाळा बंद पडल्या...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरू आहे. मुंबईचीवाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्रास वाढल्याने मुंबई पोलिसांनी अनेक प्रमुख रस्ते बंद केले आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) च्या आसपासचे रस्ते बंद करण्यात आले. मरीन ड्राइव्ह आणि पीडी मेलो रोडवरही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. आंदोलकांनी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया लिमिटेडच्या परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या भागातही वाहतूक कोंडी झाली होती. मुंबईकरांची मोठी गैरसोय होत असून, लोकांना त्यांच्या कामावर जाण्यासाठी आणि येण्यासाठी जास्त वेळ लागत आहे. शाळा आणि महाविद्यालये देखील बंद करावी लागली आहेत.