खुलताबादमध्ये जरजरी बक्ष उर्स २९ ऑगस्टपासून; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जरजरी बक्ष उर्स महोत्सवाच्या पावित्र्यास व येणाऱ्या भाविक, महिला यांच्या सुरक्षेस सर्वतोपरी प्राधान्य देण्यात यावे, त्यादृष्टीने सर्व तपासण्या वेळीच पूर्ण कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले.

हजरत शेख मुन्तजबोद्दीन जर जरी बक्ष यांचा ७३९ वा उर्स महोत्सव २९ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान खुलताबाद येथे होत आहे. यानिमित्त प्रशासनामार्फत कराव्याच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, २८ ऑगस्टला खुलताबाद येथे जाऊन आढावा घेतला. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार स्वरुप कंकाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, नगरपालिका मुख्याधिकारी समीर शेख, सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन प्रशांत अजिंठेकर, अग्निशमन अधिकारी विजय राठोड, उप कार्यकारी अभियंता यु. बी . खान, दर्गा कमिटीचे अध्यक्ष एजाज अहमद, शेख मुबशिरोद्दीन अमिरोद्दीन,मोहम्मद इम्रान मोहम्मद आबीद जहागिरदार, शेख युसुफोद्दीन चिरागोद्दीन तसेच सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, उर्स महोत्सवात येणारे भाविक, त्यातही महिला भाविक, लहान बालके यांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य द्यावे. यात्रेत विकले जाणारे खाद्य पदार्थ हे भेसळयुक्त नसावे यादृष्टीने अन्न, खाद्य पदार्थ नमुन्यांची तपासणी करण्यात यावी. तपासणीशिवाय खाद्य पदार्थ विक्री साठी ठेवता येणार नाही. तसेच गॅससारख्या इंधनाची, पेट्रोल, डिझेल सारखे पदार्थ यांची साठवणूक व वाहतूक सुरक्षितता लक्षात घेऊन करावी. यात्रा परिसरात सीसीटीव्ही कॅमेराद्वारे निगराणी ठेवावी. गुप्तचर पोलीस, महिला पोलीस यांच्यासह दर्गा कमिटीचे स्वयंसेवक यांनी यात्रेत फिरून असामाजिक, संशयस्पद व्यक्तींवर नियंत्रण ठेवावे. कुणीही गैरकृत्य करताना आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी. हरवलेली बालके, व्यक्ती यांच्या शोधासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष व उदघोषणा यंत्रणा कार्यान्वित करावी.

एस.टी. बसेसची व्यवस्था, वाहनतळ, पर्यायी वाहतूक मार्ग आदींचे नियोजन करण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सीसीटीव्ही यंत्रणा, पाणी पुरवठा व स्वच्छता व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, वीज वितरण व्यवस्था आदींची प्रत्यक्ष चाचणी घ्यावी. आरोग्य विभागाने एक पथक पूर्ण उत्सव कालावधीत कार्यान्वित ठेवावे, रुग्ण वाहिका सज्ज ठेवाव्या, यात्रेत लावण्यात येणाऱ्या रहाट पाळण्यांच्या मजबुतीची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यांत्रिकी विभागामार्फत चाचणी करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. दैनंदिन कचरा दररोज विल्हेवाट लावावी, असे निर्देश त्यांनी दिले. पोलीस अधीक्षक डॉ. राठोड म्हणाले, की पोलीस बंदोबस्त पुरेसा असेल. उर्स उत्सवात होणारी लोकांची गर्दी पाहता सुरक्षा उपायांची अंमलबजावणी केली जाईल. तसेच समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत दुर्घटना, २० वर्षीय तरुणीचे दोन्ही हात निकामी

Latest News

वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत दुर्घटना, २० वर्षीय तरुणीचे दोन्ही हात निकामी वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत दुर्घटना, २० वर्षीय तरुणीचे दोन्ही हात निकामी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील एच सेक्टरमधील मौर्या ऑटो या कंपनीतील दुर्घटनेची माहिती समोर आली आहे. २० वर्षीय...
खुलताबादमध्ये जरजरी बक्ष उर्स २९ ऑगस्टपासून; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
संघ लोकसेवा आयोगामार्फत १४ सप्टेंबरला राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा–II,  छ. संभाजीनगरात १६ परीक्षा केंद्र, ४७०२ उमेदवार
गारखेड्याच्या नवनाथनगरात मध्यरात्री राडा; गोंधळ घालू नका म्हणताच चौघांनी लोखंडी रॉडने दोन भावांना केले रक्‍तबंबाळ!!
हरवलेली चिमुकली पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरुप आईच्या कुशीत!, बजाजनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software