Exclusive : छत्रपती संभाजीनगर शहर पाणी योजना : निवडणूक पाहून दावे, आरोप करणारे किती दोषी?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमधील रहिवाशांच्या घरातील नळाला दररोज पाणी कधी येणार, या प्रश्नाचे उत्तर तूर्तास खुद्द ब्रह्मदेवसुद्धा देऊ शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाही म्हणायला राज्याच्या आधीच्या आणि सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी या संदर्भात वारंवार तारखा दिल्या खऱ्या; पण त्यातील एकही तारीख आजवर खरी ठरली नाही, हेच वास्तव आहे. संधी मिळेल तेव्हा शहरवासीयांना आश्वासन द्यायचे, नवी तारीख द्यायचे, निघून जायचे अन्‌ पुढच्या वेळी पुन्हा शहरात येताना नवी तारीख घेऊनच यायचे, एवढे एकच काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. मुख्य म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मागे लागून शहरवासीयांना दररोज पाणी मिळवून देण्यात विरोधी पक्षांचे स्थानिक आणि राज्यस्तरीय नेतेसुद्धा अयशस्वी ठरले आहेत. ही योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ती पूर्ण होणारच नाही किंवा दिवसेंदिवस तिला उशीर होईल, यासाठीच स्थानिक नेत्यांनी प्रयत्न खर्ची केल्याचे शहरवासीयांना वाटत आहे. आता निवडणुकीच्या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा समोर आला असून, शहरवासीयांना पुन्हा या योजनेच्या पूर्णत्वासाठी पुन्हा नवी तारीख मिळाली आहे. या साऱ्यात सत्ताधाऱ्यांची गोची झाली आहे, हे मात्र खरे...!

छत्रपती संभाजीनगरमधील रखडलेली पाणीपुरवठा योजना ही एक मोठी आणि बहु-टप्प्यातील योजना आहे. शहरापासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या जायकवाडी जलाशयापासून २५०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकून शहरवासीयांना दररोज पाणी देण्याची योजना आहे. आज २,७४० कोटी रुपयांच्या खर्चाच्या बनलेल्या या प्रकल्पाची सुरुवातीची किंमत १,६८० कोटी रुपये होती. पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या योजनेचा खर्च १०६० कोटींनी वाढला. हा खर्च वाढला असला तरी २०२० मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प आज २०२६ उजाडले तरी पूर्ण होऊ शकलेला नाही. योजनेचे काम कंत्राटदार कंपनीला दिल्यानंतर मार्च २०२४ ही योजना पूर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली होती. पण आज २०२६ चा जानेवारी संपत आला आहे. आतापर्यंत या योजनेतील जलशुद्धीकरण केंद्र उभारणी आणि मुख्य जलवाहिनीचे काम मात्र झाले आहे. परंतु शहरवासीयांना दररोज पाणी मिळण्यासाठी अजूनही मोठा कालावधी लागणार हे निश्चित आहे. प्रकल्पाचे काम मिळालेल्या कंपनीकडून योजनेच्या कामात  झालेली दिरंगाई तर कधी तांत्रिक अडचणी यामुळे प्रकल्प पूर्णत्वाची डेडलाईन अनेकदा चुकली आहे. यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरात नळाला ५ ते ७ दिवसांआड पाणी येत आहे.

मुख्यमंत्र्यांचे आदेश, नेत्यांची आश्वासने...
गेल्या सहा वर्षांत राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील मोठा राजकीय नेता शहरात आला आणि शहर पाणी योजनेचा विषय निघाला नाही, असे कधीच झाले नाही. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्येक वेळी शहरात आल्यानंतर या विषयावर भाष्य केले. आताची निवडणूक सोडली तरी चार महिन्यांपूर्वी फडणवीस शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी योजनेचे काम पूर्ण होत आले असून, डिसेंबर २०२५ मध्ये चाचणी सुरू होईल, असे ठासून सांगितले होते. पण हे केवळ बोलण्यापुरतेच होते का, असा प्रश्न आजही शहरवासीयांना पडलेला आहे. याचा दुसरा अर्थ राज्यातील सत्ताधारी पक्षाचे शहरातील नेते, शहराचा प्रशासकीय कारभार हाकणारे आणि या योजनेची संबंध असणारे अधिकारी मुख्यमंत्र्यांना योजनेच्या पूर्णत्वाविषयी आजवर खोटी माहिती देत होते असा होतो. पण या साऱ्यात मुख्यमंत्री अनेकदा तोंडघशी पडले, याचे भान कुणालाच राहिले नाही.

याशिवाय उदय सामंत, अतुल सावे, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे या मंत्रिपद भोगलेल्या किंवा भोगणाऱ्या नेत्यांसह केंद्रात शहराचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. भागवत कराड या साऱ्यांनीच या योजनेवर आजवर अनेकदा भाष्य केले. पूर्णत्वाच्या तारखा दिल्या. पण यातील एकही तारीख आजवर खरी ठरलेली नाही. आताही निवडणुकीच्या निमित्ताने शहरात येऊन गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी एप्रिलपासून शहराला रोज पाणीपुरवठा सुरू होईल, असे आश्वासन टॉक शोच्या माध्यमातून दिले होते. महत्त्वाचे म्हणजे त्याच्या अवघ्या दोन दिवस आधी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहर पाणी योजना वर्षभर तरी पूर्ण होऊ शकत नसल्याची कबुली देऊन खळबळ उडवली होती. छत्रपती संभाजीनगरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पाणी योजनेचे काम वर्षभर पूर्ण होऊ शकत नाही, अशी कबुली जेष्ठ मंत्रीच देत असतील, तर ज्या विषयावर महिना -दोन महिन्यांचे आश्वासन देणारे नेते खोटे बोलत आहेत हे उघड आहे.

शहरवासियांच्या भावनेशी हा खेळच!
एकंदरीत छत्रपती संभाजीनगरकरांच्या भावनेशी राजकीय नेत्यांनी केलेला खेळच म्हणावा लागेल. आजवर योजना तांत्रिक अडचणी आणि अंमलबजावणीच्या कारणांमुळे रखडली असली तरी आता योजनेचे काम अंतिम टप्प्यात आल्याने शहरवासीयांच्या आशा उंचावल्या आहेत. पण या उंचावलेल्या आशा पूर्णत्वास कधी जातील आणि आजवर आपल्याला पाणी मिळू न देण्याचे पाप कोणी केले, या प्रश्नांचा गुंता आजही छत्रपती संभाजीनगरवासीयांच्या कायम आहे. अर्थात हा गुंता लवकरच सुटेल आणि घरातील नळांना २४ तास ७ दिवस पाणी पाहायला मिळण्याचे त्यांचे स्वप्न लवकर पूर्ण होईल, हीच छत्रपती संभाजीनगरकरांची इच्छा आहे. त्यांची ही इच्छा पूर्ण होईल तो दिन सुदिन ठरेल.

आतापर्यंतच्या डेडलाइन्स
डॉ. भागवत कराड : जानेवारी २०२४ (दिवसाआड पाणी)
खा. संदिपान भुमरे : डिसेंबर २०२४ पर्यंत
संजय शिरसाट : एप्रिल २०२५
अतुल सावे : जून २०२५
उदय सामंत : २०२६ मध्ये योजना पूर्ण होईल.
देवेंद्र फडणवीस : डिसेंबर २०२५ आणि आता एप्रिल २०२६
चंद्रशेखर बावनकुळे : अजून वर्षभर तरी योजना पूर्ण होणार नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वेरूळची धक्कादायक घटना : लॉजच्या रूममध्ये शिरताच प्रेयसीकडून पैशांसाठी ब्लॅकमेल, पुरुषाने तिच्या समोरच गळफास घेऊन केली आत्‍महत्‍या!

Latest News

वेरूळची धक्कादायक घटना : लॉजच्या रूममध्ये शिरताच प्रेयसीकडून पैशांसाठी ब्लॅकमेल, पुरुषाने तिच्या समोरच गळफास घेऊन केली आत्‍महत्‍या! वेरूळची धक्कादायक घटना : लॉजच्या रूममध्ये शिरताच प्रेयसीकडून पैशांसाठी ब्लॅकमेल, पुरुषाने तिच्या समोरच गळफास घेऊन केली आत्‍महत्‍या!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : प्रेमसंबंध असलेल्या महिलेसोबत लॉजवर गेल्यानंतर तिने ब्लॅकमेल सुरू केल्याने ५१ वर्षीय व्यक्तीने लॉजच्या खोलीतच...
कन्नड हादरले : वंदनाने गुप्तांग दाबून मारले, धीरजने डोक्यात घातले शस्‍त्राचे वार, माजी सरपंचपूत्राच्या हत्‍येचे गूढ उकलले!!
छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी ‘व्हॉइस ऑफ फ्युचर’ सेमिनार!, विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजकांची नोंदणी सुरू...
बिडकीनजवळील जुगार अड्ड्यावर छापा, ‘या’ ७ जणांना पकडले!‌
१६ वर्षीय मुलीला फूस लावून पळवले, छत्रपती संभाजीनगरच्या कुंभेफळची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software