विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्‍ट वृत्तसेवा) : विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार तथा ठाकरे गटाचे जिल्‍हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केलेल्‍या दादागिरीने मंगळवारी (१० मार्च)  छत्रपती संभाजीनगरच्‍या पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीला गालबोट लागले. दानवेंनी भाजपच्‍या उमेदवाराची कॉलर पकडून त्‍यांना धमक्‍या दिल्‍या. दानवेंची ही दादागिरी भाजपच्‍या आक्रमक कार्यकर्त्यांसह पोलिसांनी हाणून पाडली असली तरी कोणतेही मोठे पद नसताना दानवे यांनी केलेल्‍या या कृत्याची निंदा जिल्हाभर केली जात आहे. सदस्यांच्या बाबतीत स्वतः निष्काळजीपणा करायचा, निवडणुकीला गांभीर्याने घ्यायचे नाही आणि नंतर प्रतिस्पर्ध्याच्या खेळीवर असा आक्रमकपणा धारण करायचा, हे सामान्यांना रूचलेले नाही. स्वतःला अपयश का येते, याचे आत्मचिंतन दानवेंनी करण्याची गरज असल्याची परखड टीका होत आहे. राजकारणात खेळ्या केल्या जातात, असे म्हणणे संयुक्तीक ठरेल, कारण खुलताबादमध्ये ठाकरे गटाने काही वेगळे केले नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या पक्षाच्या उमेदवाराची कॉलर धरली, त्याच पक्षासोबत खुलताबादमध्ये घरोबा केला. मग तुमचे ते राजकारण आणि भाजपचा तो सत्तेचा गैरवापर, असे सोयीचे राजकारण दानवे कसे खेळू शकतात, हे कोडे अनाकलनीय आहे.

छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्‍या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत चक्क ठाकरे गट आणि व शिंदे गट एकत्र येणार होते आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार होते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, की शिंदे गट आणि ठाकरे गट हे सध्याच्या राजकारणातले सर्वाधिक कट्टर राजकीय वैरी आहेत. ते एकमेकांवर आरोप करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. वेळप्रसंगी या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करताना खालची पातळी गाठतात. असे असताना ते एकत्र येऊ शकतात, हे आश्चर्यापलिकडे नाही. मात्र याची कुणकुण लागताच भाजपने ठाकरे गटाचे तीन सदस्‍य गायब करून दोन्‍ही शिवसेनांची खेळी उलथवून टाकली.

भाजपने या निवडणुकीत सभापतिपदासाठी कल्‍याण गायकवाड यांना रिंगणात उतरवले होते. आपल्‍या पक्षाचे तीन सदस्‍य भाजपच्‍या सोयीचे राजकारण खेळत असल्याचे कळताच अंबादास दानवे संतापले आणि त्‍यांनी थेट पंचायत समिती गाठून गायकवाड यांची कॉलर पकडून त्‍यांना ‘आमचे सदस्‍य कुणी पळवले’, असा जाब विचारला. दानवे यांच्‍या या पवित्र्यामुळे तेथे उपस्‍थित भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्तेही आक्रमक झाले आणि त्‍यांनी रोखले. लगोलग तेथे दाखल झालेल्‍या पोलिसांनीही दानवेंना रोखले. यामुळे या वादावर निवडणुकीपुरता पडदा पडला. त्यानंतर गायकवाड यांना पंचायत समितीत अर्धा तास बसून राहावे लागले. किशोर शितोळे आल्यावरच ते बाहेर पडले. दानवेंचा हे कृत्य दहशत माजवण्यासारखेच आहे.

दानवे सध्‍या फक्‍त ठाकरे गटाचे जिल्‍हाप्रमुख, नेते आहेत. त्यांच्‍याकडे कोणतेही संवैधानिक पद नाही. तरीही भाजपने संयमाने घेऊन इच्छित खेळी करून दादागिरीला उत्तर दिले. पण दानवेंना असे करण्याचा अधिकार आहे का, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. प्रत्येक निवडणुकीत त्यांचे निर्णय आजवर चुकीचे ठरत आल्याची चर्चा खुद्द कार्यकर्त्यांत आहे. लोकसभा निवडणुकीपासून हा प्रकार सुरू आहे. चंद्रकांत खैरे लोकसभेत कसे पडले की आपल्याच लोकांनी जाणूनबुजून पाडले, याची अधूनमधून चर्चा होत असते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे कसे हसे झाले, हेही सर्वांनी पाहिले.

पराभूत झाल्यानंतर भाजपमधून आयात केलेले उमेदवार पुन्हा भाजपमध्ये निघून गेले, तेही ठाकरे गटाच्या नेत्यांवर टीका करून. महापालिका निवडणुकीत ‘मामूं’साठी अवघा पक्ष धोक्यात कुणी आणला, हेही सर्वांनी पाहिले. एवढे झाल्यानंतर पक्षनेतृत्त्वाकडून जिल्हा परिषद निवडणुकीची सूत्रे चंद्रकांत खैरे यांच्या हाती सोपवली जातील, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र पुन्हा दानवेंनीच सूत्रे स्वतःच्या हाती कायम ठेवली. पुन्हा भाजप- शिंदे गटाने जोरदार धोबीपछाड दिली. या सगळ्या गोष्टीला दानवेंकडे केवळ एकत्र उत्तर असते, ते म्हणजे सत्ता आणि पैशांचा गैरवापर सत्ताधाऱ्यांनी केला...

कार्यकर्ते वैतागले...
ठाकरे गटात सध्या स्थानिक पातळीवर चंद्रकांत खैरे-अंबादास दानवे यांच्यातील शह-काटशहाचे राजकारण रंगलेले असते. आपल्या विरोधात दानवे वागत असतात, असा आरोप खुद्द खैरे करत आले आहेत. खैरेंची चिडचिड होते, ते बोलून व्यक्त होतात. पण दानवे त्यांना फारसे गांभीर्याने न घेतात त्यांची वाटचाल सुरू ठेवतात. दोघांच्या या गटबाजीला कंटाळून आजवर अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाला राम राम ठोकून भाजप, शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकतर बहुसंख्येने उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून येतात त्यांना ‘सांभाळून’ ठेवता येत नाहीत, हे आपले अपयश मानण्याऐवजी, त्रागा करून, संताप करून थेट प्रतिस्पर्धी उमेदवाराची कॉलर पकडावी, हे राजकारणी म्हणून दानवेंना शोभत नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू

Latest News

दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदावरी पात्रात स्नानासाठी उतरलेल्या ६० वर्षीय वारकऱ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू...
महिलेची हत्या करून पळून जाणाऱ्या मारेकऱ्याला छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर पकडले!
महंत रामगिरी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध गंगापूरमध्ये गुन्हा दाखल
विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?
आरटीओ कार्यालयातच भीषण दुर्घटना : चालकाने ट्रक मागे घेताना निष्काळजीपणा केला अन्‌ एजंटचा चाकाखाली येऊन मृत्यू!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software