- Marathi News
- सिटी डायरी
- मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा : १५६ कोटींतून वेरूळचा विकास होणार, १०१५ हून अधिक तरुणांनी उभारले व्यवस...
मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा : १५६ कोटींतून वेरूळचा विकास होणार, १०१५ हून अधिक तरुणांनी उभारले व्यवसाय, पालकमंत्री शिरसाट म्हणाले, विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर जनतेचा सहभाग आवश्यक!
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शेवटच्या माणसाचा विकास या उद्देशाने शासन वाटचाल करत आहे. लोकांना तत्पर आणि दर्जेदार सेवा देतानाच विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर जनतेचा सहभाग आवश्यक आहे. आपण सारे मिळून आपला जिल्हा, राज्य आणि देश प्रगतिपथावर नेऊया, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज, १५ ऑगस्टला येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात केले.
.jpg)
.jpg)
प्रारंभी पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना पालकमंत्री शिरसाट यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी मंत्री शिरसाट म्हणाले, की आपल्या जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होत आहे. त्याचीच प्रचिती मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमातून आपल्याला आली. आता मुख्यमंत्र्यांनी १५० दिवसांचा कृती कार्यक्रम दिला आहे. या उपक्रमांमध्येही नागरिकांना दर्जेदार व तत्पर सेवा देणे हेच उद्दिष्ट शासनाचे आहे. जिल्ह्यातील वेरुळ या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी १५६ कोटी रुपयांचा निधी खर्चून विकासकामे केली जाणार आहेत. भारतीय पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली हा विकास केला जाणार आहे. याकडे मुख्यमंत्री महोदयांचे विशेष लक्ष आहे.
पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, जिल्ह्यात जुलै महिनाअखेर एकूण ७२२ रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा लाभ मिळाला असून ६ कोटी ४ लाख ९७ हजार ५०० रुपये इतका मदत निधी देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्ह्यातील १०१५ हून अधिक तरुण नवउद्योजकांनी स्वतःचे उद्योग-व्यवसाय उभारला आहे. यंदाही १९०० जणांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट असून जिल्ह्यातील नव उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात ४४१ वसतिगृहे सामाजिक न्याय विभागामार्फत चालविली जात आहेत. आता राज्यात आणखीन १२५ नवीन वसतिगृहे आपण उभारत आहोत. २५ हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल.
सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेतही वाढ केली आहे. तसेच सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध महामंडळांच्या शासन हमी रकमेत वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रशासन उत्तम काम करीत असून त्यात लोकांचा सहभाग घ्यावा. लोकांच्या सहभागातूनच विकासाची ही वाटचाल यशस्वी होणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पालकमंत्र्यांच्या हस्ते माजी सैनिक नायब सुभेदार रमेश सावळे, हवालदार विजय कुंटे, कारागृह उपमहानिरीक्षक येथील हवालदार संतोष जगदाळे, पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षक दीपक परदेशी, प्रमोद पवार, राजेंद्र मोरे यांना गौरविण्यात आले. शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विराज रमेश पवार, हिंदवी धनंजय पाटील, रुद्र धनंजय पाटील, नील रवींद्र सोमडे यांनाही गौरविण्यात आले.