- News
- सिटी डायरी
- कलावंत हे सॉफ्ट टार्गेट झाले आहेत : अभिनेत्री वनिता खरात; विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचे था...
कलावंत हे सॉफ्ट टार्गेट झाले आहेत : अभिनेत्री वनिता खरात; विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचे थाटात उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : कलावंतांकडून बोलताना थोडासा शब्द जरी इकडे तिकडे झाला तर ट्रोल केले जाते. एका अर्थाने कलावंत हे सॉफ्ट टार्गेट झाले आहेत. त्यामुळे त्यांनी बोलताना अधिक काळजी घ्यायला हवी, असे मत महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात यांनी व्यक्त केले. सुंदरता दिसण्यावर अवलंबून नसते तर तुमच्या विचारातून, अभिनयातून आपण ती प्रकट करू शकता. त्यामुळे युवा कलावंतांनी अधिक प्रामाणिक व कष्ट करून स्वतःला सादर करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
नाटकातला न देखील माहीत नसलेला, कसल्याही सोयीसुविधा नसतानाही माझ्यासारखा खेड्यातला मुलगा जर दिग्दर्शक होऊ शकतो. तुम्हाला तर सगळं सोयीसुविधा, रंगमंच, युवक महोत्सव यासारखी व्यासपीठ उपलब्ध असताना तुमच्या प्रतिभेला का बहर येणार नाही, असा प्रश्न दिग्दर्शक तथा विद्यापीठाचा माजी विद्यार्थी रावबा गजमल यांनी केला. संघर्ष हा मराठवाड्याच्या पाचवीलाच पूजलेला असून पदोपदी होणारा अपमान हीच आपल्या सन्मानाची पायाभरणी असते, अशी समजून नाउमेद न होता कामाला लागा. प्रामाणिकपणाने स्वतःला शोधत जा... असेही ते म्हणाले.

मराठवाड्यातील अतिवृष्टीचे शोभायात्रेतही दर्शन; वीस संघांचा सहभाग
अतिवृष्टीने मराठवाड्यात मांडलेल्या प्रलयाचे प्रतिबिंब युवक महोत्सवाच्या शोभायात्रेतही उमटले. सहभागी वीसपैकी पाच संघांनी अतिवृष्टीमुळे लोकांच्या झालेल्या हालापेष्टाचे चित्र मांडले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यापासून (वाय कॉर्नर) शनिवारी सकाळी नऊ वाजता प्रारंभ झाला. पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्या हस्ते फेरीस हिरवा झेंडी दाखविण्यात आली.

कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्र कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास संचालक डॉ. कैलास अंभुरे यांच्यासह अधिष्ठाता, संवैधानिक अधिकारी, विविध अधिकार मंडळाचे सदस्य, संघ प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, कलावंत यांनी सहभाग घेतला. यानंतर उद्घाटन सोहळा व चारही रंगमंचावर कला प्रकारांना प्रत्यक्ष सुरुवात झाली. शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी विविधतेतून एकता आणि संस्कृतीचे दर्शन घडवण्याबरोबरच भारतीय संविधान आमचा अभिमान, पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावा झाडे जगवा, पूरस्थिती टाळा असा संदेश दिला. या शोभायात्रेत वीस महाविद्यालयांचा सहभाग होता.


