छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १२ वीतील ३ मुलांवर ३ तरुणांनी सशस्त्र प्राणघातक हल्ला चढवल्याची खळबळजनक घटना पिसादेवीनजिकच्या श्री पारदेश्वर मंदिराजवळ बुधवारी (२५ फेब्रुवारी) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. हल्ल्यात एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे, तर दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरल्याने किरकोळ जखमी झाले. चिकलठाणा पोलिसांनी ३ संशयित तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बालाजी गंगाधर धामणे (वय १९, रा. पिसादेवी, छत्रपती संभाजीनगर) या विद्यार्थ्याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, तो आई-वडिलांसह राहतो. सध्या १२वीत पळशी शिवारातील श्री धारेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात शिकतो. सध्या त्याची १२ वीची परीक्षा चालू आहे. बुधवारी बायोलॉजीचा पेपर असल्याने व परीक्षा केंद्र श्री धारेश्वर महाविद्यालय असल्याने तो परीक्षेसाठी सकाळी ९ ला मित्र स्वराज संतोष काळे (रा. पिसादेवी) सोबत त्याच्या मोटारसायकलीने गेला होता. पेपर दुपारी २ ला पर्यंत संपला. त्यानंतर बालाजी, संतोष हे मित्र स्वराज संतोष काळे व दीपक जनार्धन दहीहंडे (रा. पळशी) यांच्यासह मोटारसायकल लावलेल्या ठिकाणी येत असताना मागून मोटारसायकलवर तीन अनोळखी मुले आली.
त्यांनी स्वराजवर मागून अंगावर गाडी घातली. त्यावेळी बालाजी व त्याच्या मित्रांनी त्यांना गाडी अंगावर का घातली, असे विचारले. त्यावर पुढे चला, मग तुम्हाला सांगतो असे म्हणून ते पुढे निघून गेले. त्यानंतर बालाजी व स्वराज एका मोटारसायकलीवर व दीपक त्याच्या मोटारसायकलीवर पिसादेवीकडे येत असताना दुपारी अडीचच्या सुमारास पारदेश्वर मंदिराजवळ अंगावर गाडी घातलेली तीन मुले पुन्हा त्यांच्या मोटारसायकलीवर समोरून आले. त्यांनी मोटारसायकल आडवी लावून शिवीगाळ सुरू केली. दीपकच्या डोक्यात कोणत्या तरी हत्याराने मारून त्याचे डोके फोडून जखमी केले. त्यानंतर तिघांनी त्यांच्या हातात चाकू घेऊन बालाजीकडे धाव घेतली.
बालाजी व स्वराज मोटारसायकल तेथेच सोडून शेतात पळाले. तिन्ही मुलांनी हातात चाकू घेऊन दोघांचा पाठलाग केला. त्यांनी बालाजीला पकडले. स्वराज पळून जाण्यास यशस्वी झाला. त्यानंतर तीन मुलांपैकी एकाने बालाजीच्या पोटावर चाकूने मारून जखमी केले. नंतर त्यांच्या मोटारसायकलीवर बसवून नारेगाव येथे घेऊन जाऊन तुला मारून टाकतो, असे म्हणून पाठीत, डोक्यात चापटबुक्क्याने मारहाण केली. त्यांनी पिसादेवी चौफुली येथे गाडी थांबवल्याने त्यांना हिसका देऊन बालाजीने पळ काढला व पिसादेवी येथील शेतात जाऊन लपला. त्यानंतर ते तेथून निघून गेले. बालाजी मातोश्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आला.
त्याच्यावर उपचार चालू स्वराज काळे आला. त्यानंतर स्वराज काळे याने दीपक दहीहंडेला कॉल लावून विचारले असता त्याने सांगितले की, मी पळशी येथे घरी आलो आहे. मारहाण करणारापैकी एकाचे आय कार्ड मी त्याच्या गळ्यातून हिसकावून घेतलेले आहे, असे सांगितले. आय कार्डवरील फोटो व नाव आदित्य मिलिंद घुसाळे (रा. छत्रपती संभाजीनगर) असे होते. त्यामुळे चिकलठाणा पोलिसांनी आदित्य घुसाळे व त्याच्यासोबतच्या अनोळखी दोन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सतीश देवकर करत आहेत.