- News
- सिटी क्राईम
- सिरियल ब्राइडची कहाणी : वऱ्हाडाची गाडी चहापाण्यासाठी थांबताच वधू अलिशान कारमधून पसार!; नवरा मुलगा पा...
सिरियल ब्राइडची कहाणी : वऱ्हाडाची गाडी चहापाण्यासाठी थांबताच वधू अलिशान कारमधून पसार!; नवरा मुलगा पाहतच राहिला... सिडको पोलिसांत वधूसह २ भामट्या महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : कोर्टात लग्न लागल्यानंतर सासरी निघालेल्या वधूने चहापाण्यासाठी गाडी थांबताच रस्त्यातूनच दुसऱ्या कारमधून धूम ठोकली. ही खळबळजनक घटना सिडको एन ६ मध्ये घडली. सिडको पोलिसांनी वधूसह ३ महिलांविरुद्ध शनिवारी (१८ ऑक्टोबर) गुन्हा दाखल केला आहे.
नक्की काय घडलं?
नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे शेतकरी पत्नी व दोन मुलांसह शेती करतात. त्यांचा मुलगा कल्पेशच्या (नाव बदलले आहे) लग्नासाठी मुलगी पाहणे सुरू होते. मात्र लग्न जुळविण्यात अडचणी येत होत्या. त्यांच्या शेतात कामाला येणाऱ्या महिलेने ओळखीतील मुलगी असल्याचे सांगितले. बोलणीसाठी मुलीची मावशी म्हणून ज्योती गायकवाडचा नंबर दिला. शेतकरी, त्यांचा मुलगा आणि इतर कुटुंबीय गेल्या २३ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरला आले. सिडको एन ६ भागातील ज्योतीच्या घरी ठरल्यानुसार मुलीला पाहण्याचा कार्यक्रम झाला.
मुलगी माया शेतकरी कुटुंबाला आवडली. यावेळी ज्योतीसोबत रेखा मिसाळही हजर होती. मायाच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले असून, आईवर उपचार सुरू असल्याचे खोटेच ज्योतीने शेतकरी कुटुंबाला सांगितले. शेतकरी कुटुंबाकडे मुलीच्या आईच्या उपचारासाठी व दागिन्यांसाठी १ लाख ८० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर कोर्ट मॅरेज करायचे म्हणून वकिलालासुद्धा ५ हजार रुपये पाठवायला सांगितले. १ लाख रुपये रोख, ३० हजार फोनपेद्वारे, ५० हजार रुपये मित्रामार्फत आणि १ लाख ७९ हजार रुपयांचे दागिने असे एकूण ३ लाख ८६ हजार रुपये शेतकरी कुटुंबाने भामट्या महिलांना दिले.
ठरल्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी २४ सप्टेंबरला सकाळी लग्नासाठी सर्व मंडळी जिल्हा न्यायालयासमोर कोर्ट मॅरेजसाठी एकत्र आली. तलवार नावाच्या वकिलाने मुला-मुलीची कागदपत्रे घेतली व फी म्हणून १२ हजार घेतले. त्यानंतर लग्न लागल्याचे सांगत नवरीला मुलीला सोबत नेण्याची परवानगी दिली. शेतकरी कुटुंब नवरीला घेऊन गावाकडे निघाले असता चहापाण्यासाठी एका ठिकाणी गाडी थांबली असता, त्याचवेळी एक स्कॉर्पिओ तिथे आली. या स्कॉर्पिओत बसून नवरी मुलगी पसार झाली.
कोपरगाव पोलिसांनी पकडल्या भामट्या...
बदनामीच्या भीतीने शेतकरी कुटुंबाने पोलिसांत तक्रार दिली नाही. मात्र कोपरगाव (जि. अहिल्यानगर) येथे लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी पोलिसांनी पकडल्याचे शेतकऱ्याला कळताच त्यांनी कोपरगावला जाऊन पोलिसांकडे चौकशी केली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना संशयित महिला दाखवल्या असता आपल्यालाही फसवणाऱ्या याच महिला असल्याचे शेतकऱ्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांच्या सल्ल्यानुसार मग त्यांनी छत्रपती संभाजीनगरला येत सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी या तक्रारीला गांभीर्याने घेत तातडीने गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

