- News
- पॉलिटिक्स
- हंबरडा फोडून झाल्यावर आता उद्धव ठाकरे म्हणणार, दगाबाज रे... छत्रपती संभाजीनगरचा धावता दौरा, शेतकऱ्या...
हंबरडा फोडून झाल्यावर आता उद्धव ठाकरे म्हणणार, दगाबाज रे... छत्रपती संभाजीनगरचा धावता दौरा, शेतकऱ्यांना भेटणार पण काही मिनिटेच..., निवडणूक तयारीवर चर्चेसाठी पदाधिकाऱ्यांना दिला १ तास!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ११ ऑक्टोबरला हंबरडा फोडल्यानंतर आता दगाबाज रे म्हणत ५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान मराठवाड्यात शेतकरी संवाद दौरा काढणार आहेत. ५ नोव्हेंबरला सकाळी १० ला ते छत्रपती संभाजीनगरच्या नांदर (ता. पैठण) येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी अवघ्या काही मिनिटांत संवाद साधून पुढे बीड जिल्ह्यात रवाना होणार आहेत. अवघ्या काही मिनिटांच्या या दौऱ्यातून काय साध्य होणार, असा प्रश्न केला जात आहे. या दौऱ्यावर मंत्री संजय शिरसाट यांनीही टीका केली आहे.
शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याबद्दल भाष्य केले आहे. त्यांना टोला लगावत दानवे म्हणाले, की शिंदे गट म्हणजे दिल्या भाकरीचे आणि सांगितल्या कामाचे आहेत. शिंदे गट भाजपच्या मर्जीवरच चालणारा पक्ष आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना वारंवार दिल्लीला जावे लागते. महायुतीचे सरकार दगाबाज असून, त्यांनी शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत दिली नाही, अशी टीकाही त्यांनी केली. फलटण येथे डॉ. संपदा मुंडे प्रकरणात ठाकरे गट मोर्चा काढणार असल्याचेही दानवे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला उपनेते सुभाष पाटील, राजू वैद्य, सुकन्या भोसले आदींची उपस्थिती होती.
मंत्री शिरसाट यांची टीका
उद्धव ठाकरे यांचा दौरा म्हणजे दोन मिनिटे शेतकरी आणि १० मिनिटे कार्यकर्ते असा असतो, अशी टीका सामाजिक न्यायमंत्री, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. राज ठाकरेंची एन्ट्री महाविकासात आघाडीत फूट टाकणारी आहे. कारण, ते काँग्रेससोबत कधीच जाणार नाहीत. देशात अनेक कन्फ्यूज नेते आहेत. त्यांच्यात आता राज ठाकरेंची भर पडली आहे. कोणता झेंडा घेऊ हाती, अशी अवस्था मनसैनिकांची झाली आहे. राज ठाकरे हे वेळोवेळी राजकीय भूमिका बदलत असतात. उद्या तुमचे महाविकास आघाडीत काय स्थान असेल, असा सवालही शिरसाट यांनी राज ठाकरे यांना केला. आपण काल काय बोललो आणि आज काय बोलत आहोत यात ते कन्फ्यूज आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

