पत्ता कोबीतील किड्याने १८ वर्षीय मुलीचा मृत्यू!, डॉक्टरांनी सांगितले की हा किडा मेंदूत कसा प्रवेश करतो अन् तो कसा रोखायचा...
उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील १८ वर्षांची विद्यार्थिनी इल्मा नदीम हिचा दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. फास्टफूड खाल्ल्यानंतर तिची तब्येत बिघडली. सुमारे एक महिन्यापूर्वी तिला टायफॉइड झाला होता, परंतु बरे होण्याऐवजी तिची प्रकृती आणखीच बिकट झाली. नोएडातील एका खासगी रुग्णालयात केलेल्या सीटी स्कॅन आणि एमआरआय तपासणीत डॉक्टरांना तिच्या मेंदूत २० ते २५ गाठी आढळल्या, ज्या कदाचित परजीवी संसर्गामुळे झाल्या. डॉक्टरांचा दावा आहे, की हा संसर्ग फास्ट फूडमध्ये वापरल्या जाणाऱ्या कोबीमधून पसरला आहे. तिची प्रकृती बिघडल्याने तिला आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिच्या मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली, परंतु सर्व प्रयत्न करूनही तिचा जीव वाचवता आला नाही. फास्ट फूडमध्ये कोबीचा वापर केला जातो आणि असे म्हटले जाते की कोबीचे किडे मेंदूत प्रवेश करू शकतात. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीची स्थिती बिघडू शकते आणि मृत्यू देखील होऊ शकतो. न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रियंका शेरावत यांनी एका पोस्टमध्ये मेंदूतील किड्यांचा विषय सविस्तरपणे मांडला आहे.
कोबीचा किडा म्हणजे काय?
बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की कोबी खाल्ल्यानंतर त्यातील किडे मेंदूत प्रवेश करतात. ज्यामुळे व्यक्ती वेडा होऊ शकतो, पक्षाघात होऊ शकतो किंवा मृत्यूही होऊ शकतो. यामुळे प्रश्न निर्माण होतो: हे खरे आहे का? डॉक्टरांनी स्पष्ट केले की कोबी शेतात पिकवल्यावर माती आणि ओलाव्यामुळे सहजपणे कीटकांसाठी प्रजनन स्थळ बनते. त्याची पाने थरबद्ध असतात, ज्यामुळे लहान कीटक आणि त्यांची अंडी आत लपतात. तथापि, याचा अर्थ असा नाही की कोबी खाल्ल्याने किडे थेट मेंदूत शिरतात.
डॉक्टरांनी स्पष्ट केले की ‘ब्रेन वर्म'ला वैद्यकीय भाषेत न्यूरोसिस्टिसरकोसिस म्हणतात. हा आजार टेनिया सोलियम नावाच्या टेपवर्मच्या अंड्यांमुळे होतो. या किड्याची अंडी माती, घाणेरड्या भाज्या आणि कमी शिजवलेल्या मांसामध्येही असू शकतात. डॉक्टरांच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती घाणेरड्या भाज्या किंवा कमी शिजवलेले मांस खातो तेव्हा या किड्यांची अंडी पोटात जातात. आपली पचनसंस्था अनेकदा ही अंडी पूर्णपणे नष्ट करण्यात अपयशी ठरते. ही अंडी रक्तप्रवाहातून शरीराच्या विविध भागांमध्ये, जसे की मेंदू, डोळे, यकृत आणि स्नायूंमध्ये जाऊ शकतात. जेव्हा ही अंडी मेंदूपर्यंत पोहोचतात तेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया देते, ज्यामुळे मेंदूला सूज येते.
मेंदूच्या सूजमुळे, रुग्णांना तीव्र डोकेदुखी, उलट्या, चक्कर येणे आणि झटके येऊ शकतात. डॉक्टरांच्या मते, देशातील मुलांमध्ये न्यूरोसिस्टिसरकोसिस हे झटके येण्याचे एक प्रमुख कारण आहे. याचा परिणाम फक्त मुलांनाच नाही तर प्रौढ आणि वृद्धांनाही होऊ शकतो. चांगली बातमी अशी आहे की सुमारे ९८ टक्के प्रकरणे औषधोपचाराने बरी होतात, तर फक्त २ टक्के प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया आवश्यक असते.
मेंदूच्या किड्यापासून वाचण्याचे उपाय
डॉक्टर सांगतात, की या आजारापासून बचाव करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे स्वच्छता आणि योग्य आहार. केवळ पावसाळ्यातच नाही, तर नेहमीच अर्धवट शिजलेले अन्न खाणे टाळावे. विशेषतः मांस कधीही अर्धवट शिजलेले खाऊ नये. मांस नीट धुऊन पूर्णपणे शिजवूनच खावे. याशिवाय भाज्यांची स्वच्छता करणेही फार महत्त्वाचे आहे. विशेषतः पावसाळ्यात पालेभाज्या वाहत्या पाण्यात नीट धुवाव्यात. धुतल्यानंतर त्या सुकू द्याव्यात आणि मग शिजवाव्यात. भाज्या चांगल्या प्रकारे शिजवल्यास जंतूंची अंडी नष्ट होतात आणि कोणताही धोका राहत नाही.
या गोष्टींची घ्या काळजी
डॉक्टर हेही स्पष्ट करतात की केवळ कोबीच नव्हे, तर कोणतीही घाणेरडी किंवा नीट न धुतलेली भाजी खाल्ल्यास ही समस्या उद्भवू शकते. कोबीला जास्त पत्ते असल्यामुळे त्यामध्ये जंतूंची अंडी लपलेली असण्याची शक्यता अधिक असते. मात्र याचा अर्थ असा नाही की कोबी खाणे पूर्णपणे बंदच करावे. योग्य पद्धतीने धुऊन आणि शिजवून खाल्ल्यास कोबी सुरक्षित ठरते.

