Political Exclusive : चौकडी, हुकूमी एक्का अन्‌ दुखावलेला सैनिक! : राजेंद्र जंजाळ यांना का अन्‌ कसे दूर सारले, कसे शिरसाटांचे राजकीय शत्रू केले... एकनाथ शिंदे सैनिकाला तारणार की अव्हेरणार?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

मनोज सांगळे, संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट
छत्रपती संभाजीनगर : बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जिल्ह्यातील कन्नडवगळता शिवसेनेचे सर्व आमदार गेले. मात्र पदाधिकाऱ्यांनी वेट ॲन्ड वॉचची भूमिका घेतली होती. अशावेळी सर्वात आधी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिले ते राजेंद्र जंजाळ. नंतरच्या काळात शिंदे गटाला सत्तेत चांगले दिवस आले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, नंतरच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता उपमुख्यमंत्री आहेत. अशावेळी गुळाला मुंगळे चिकटतात, तसे अनेक नेते ठाकरे गटातून शिंदे गटात आले आहेत. माजी महापौरांपासून तर माजी नगरसेवकांपर्यंत भरणा सुरू झाला आहे. राज्यात सत्ता नसल्याने आणि सतत पराभवाच्या छायेत राहिल्याने ठाकरे गटात भविष्य दिसत नसल्याने त्यांनी शिंदे गटात येणे साहाजिकच आहे.

एरवी शिंदे गटाला गद्दार गद्दार म्हणून हिणवणारी ही मंडळी कधी त्यांच्याच पंक्तीत जाऊन बसली हे कळलेही नाही. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असं म्हटलं जातं, हे या नेत्‍यांच्या बाबतीत लागू होतं. येणारा प्रत्‍येक नेता महत्त्वाकांक्षा घेऊन आला आहे. यात कुणी माजी महापौर आहे, कुणी माजी नगरसेवक आहे, कुणी महापालिकेत वेगवेगळी पदे भूषवलेली आहेत. महापालिकेत सत्ता आलीच, तर त्या सर्वांच्या या महत्त्वाकांक्षा जागृत होणार आहेत. पुढे कोणतीही शाश्वती नसताना, कोणतेही लोकप्रतिनिधी नसताना, सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणाऱ्या राजेंद्र जंजाळ यांच्याबाबतीत असे म्हटले जात होते, की जर भविष्यात शिंदे गटाचा महापौर व्हायचाच असेल तर तो राजेंद्र जंजाळ यांच्या रुपाने होईल... आता चित्र बदलले आहे, तुल्यबळ असे रथी-महारथी शिंदे गटात दाखल झाले आहेत.

ते राजकीय मुरब्बी आहेत, सत्तेची पदे पदरात कशी पाडून घ्यायची याचे पुरेसे ज्ञान त्यांना आहे. त्यातुलनेत जंजाळ हे धाडसी, आक्रमक बाण्याचे असले तरी राजकीयदृष्ट्या तेवढे कसलेले नाहीत. त्यामुळे जंजाळ यांच्या महत्त्वाकांक्षा फारशा जागरूकच होऊ द्यायच्या नाहीत, याची काळजी अलीकडच्या काळात घेतली जात आहे. शिंदे गटात सध्या मंत्री संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरच्या दृष्टीने पक्षासाठी हुकूमी एक्का आहेत. संदिपान भुमरे केंद्रात गेले, सत्तारांना मंत्रीपद नाही अशा स्थितीत शिरसाटांनी जिल्ह्यातील शिंदे गटाची सूत्रे हाती घेतल्याची स्थिती आहे. अर्थात जो पालकमंत्री असतो, त्याच्या हाती ही सूत्रे आपोआपच येत असतात. त्यामुळे आता शिरसाट यांनी सांगावे आणि पदाधिकाऱ्यांनी ऐकावे, त्यांनी सांगावं आणि पक्षाचा निर्णय व्हावा, असा सारा कारभार अलीकडच्या काळात झाला आहे. अशावेळी ठाकरे गटातून मोठ्या महत्त्वाकांक्षा बाळगून आलेल्या नेत्‍यांनी ‘शिरसाट यांच्याशी सख्य तर पुढे महापालिकेत तख्त’ हे हेरले आणि जितके त्यांच्या जवळ जाता येईल, तितके जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महापालिका निवडणुकीचा अभ्यास असल्याने, बारकावे माहीत असल्याने साहाजिकच ते जेव्हा शिंदे गटात आले, तेव्हा पक्षाला फायदा होणार, हे अधोरेखित होते. महापालिकेत शिंदे गटाची सत्ता यावी, महापौर शिंदे गटाचाच व्हावा, या पक्षीय दृष्टीकोनातून ते योग्यही असू शकते.

547369516_1316409639852403_46805

पण अशावेळी राजेंद्र जंजाळ यांना विश्वासातच घेतले जात नसेल तर कुठेतरी स्वाभिमान हा दुखावला जाणार होताच. अलीकडच्या काळात जंजाळ यांना महापालिका निवडणुकीसंदर्भातील बैठकांना डावलले गेल्याचा आरोप आहे.
गेल्या काही महिन्यांत मंत्री शिरसाट यांच्यापुढे राजकीय संकट निर्माण करण्यात आले होते, आरोप करण्यात आले होते. त्यावेळी शिरसाटांची प्रभावी बाजू मांडण्यात जंजाळांनी कोणतीही कसर सोडली नाही. शिवसेना फुटल्यापासून शिरसाटांसोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या जंजाळांना दूर करण्यात ठाकरे गटातून आलेली चौकडी आता यशस्वी ठरली आहे, असे म्हणावे लागेल. जंजाळ यांनी थेट शिरसाटांना लक्ष्य केल्याने शिरसाटही दुखावले गेले आहेत. दोघांतील दुरी आता भरली जाईल की नाही, एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जंजाळाच्या प्रवेशाच्या चर्चेने भाजपमध्ये अस्वस्थता...
एक व्यक्त झाला, तर दुसऱ्याने समजूत काढायची असते, पण जंजाळ आणि शिरसाट दोघेही कट्टर शिवसैनिक असल्याने जंजाळ बोलले तसे शिरसाटांनीही फटकारले. तुम्हाला जिकडे जायचे तिकडे जा, थांबविले कुणी? जंजाळ बाहेर पडले तरी काहीही फरक पडणार नाही, असे बोलून शिरसाट मोकळे झाले. यामुळे याचसाठी का केला होता अट्टहास, अशी उद्वेगाची भावना जंजाळ यांच्यात निर्माण झाली नसेल का? जंजाळ यांच्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग आहे. महापालिकेत सत्ता आणण्याच्या दृष्टीने जंजाळ हे भाजपला हवेच आहेत. जंजाळ येतील, सोबत समर्थक आणतील, ते येतील तेव्हा काहीतरी शब्द घेऊनच घेतील, त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना उमेदवारीचं बोलतील, तेव्हा सध्याच्या इच्छुकांचं काय, याचं गणितही भाजपला जुळवावं लागणार आहे.

सध्याच्या भाजप इच्‍छुकांना प्लॅन बी तयार करून ठेवावा लागणार आहे. जंजाळ यांना भाजपात प्रवेश द्यावा, या बाजूने काही जण बोलत आहेत, तर काही जणांत मात्र नाराजीचा सूर उमटला आहे. शहरातील तिन्ही मतदारसंघांत जंजाळ यांचे समर्थक असल्याचे बोलले जाते. सध्या भाजपकडे असा आक्रमक चेहरा नाही. जंजाळ यांच्या रुपाने तो मिळू शकतो. अशावेळी भाजप त्यांना पक्षात घेण्याची संधी सोडणार नाही. भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी तसे सूतोवाचही केले आहे. जंजाळ यांच्याशी भेटीगाठी होत आहेत. भाजपला असलेले भविष्य, आमचे वर्क कल्चर पाहून यामुळे अनेकांना पक्षात यायचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र नगरपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हे जंजाळ आणि शिरसाट यांच्यातील वाद कसा शमवतात, जंजाळ यांचे समाधान कसे करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसैनिकांची किंमत माहीत आहे, ते छत्रपती संभाजीनगरमधील सुरुवातीपासून आतापर्यंतच्या राजकीय परिस्थितीला लक्षात घेऊनच निर्णय घेतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software