- News
- सिटी डायरी
- प्रशासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न!; फराळ किट, किराणा साहित्य
प्रशासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न!; फराळ किट, किराणा साहित्य अन् रब्बी हंगामासाठी बियाणे किटचे केले वाटप
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आज, १६ ऑक्टोबरला दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ‘एक हात मदतीचा’ दिला. दिवाळ सणासाठी लागणाऱ्या वाण सामानाचे किट देण्यात आले. शेतकरी आत्महत्येसारख्या दुर्दैवी प्रसंगाला आपण सामोरे जात असताना खचून जाऊ नका, प्रशासन, समाज तुमच्या सोबत आहे, अशा शब्दांत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थित शेतकरी कुटुंबीयांना दिला.
२६७ कुटुंबांना मदतीचा हात
जिल्ह्यातील एकूण २६७ जणांना ही मदत देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीनगर, पैठण, फुलंब्री आणि सिल्लोड येथे सिल्लोड, सोयगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना मदत देण्यात आली. उद्या, १७ ऑक्टोबरला सकाळी १० वा. कन्नड येथे कन्नड व खुलताबाद तालुक्यातील व दुपारी ३ वा. लासूर स्टेशन येथे वैजापूर, गंगापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत देण्यात येईल.
असा राबविला उपक्रम
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे सर्वेक्षण जिल्हा प्रशासनाने सेवा पंधरवाड्यानिमित्त तालुकास्तरावर केले. या सर्वेक्षणातून मदतीची गरज असणाऱ्या शेतकरी कुटुंबांची निवड करण्यात आली. शासकीय योजनेच्या लाभाबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करून एक किट तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण २६७ कुटुंबियांना मदत केली जात आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ३९ शेतकरी कुटुंब, फुलंब्रीमध्ये ३०, पैठण तालुक्याचे ४०, सिल्लोड येथील ६२, सोयगाव येथील १२, कन्नड येथील ३६, खुलताबाद येथील ४ शेतकरी आणि वैजापूर येथील १० गंगापूर येथील ३४ तसेच इतर उर्वरित सदस्यांना मदत करण्यात येणार आहे.

