- News
- पॉलिटिक्स
- छत्रपती संभाजीनगर इलेक्ट्रिक वाहनांसाठी देशाची राजधानी बनतेय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अतिवृष्ट...
छत्रपती संभाजीनगर इलेक्ट्रिक वाहनांसाठी देशाची राजधानी बनतेय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अतिवृष्टीग्रस्तांच्या पाठिशी शासन ठाम असल्याची दिली ग्वाही!!
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी २७०० कोटी रुपयांची योजना सरकारने मंजूर केली आणि महानगरपालिकेचा ८०० कोटींचा हिस्सादेखील भरण्याचा निर्णय घेतला. समृद्धी महामार्ग आणि डीएमआयसीमुळे आज सर्व गुंतवणूकदारांना अतिशय महत्त्वाचे स्थान ज्याला आपण आवडीचे स्थान म्हणू शकतो ते आता छत्रपती संभाजीनगर झाले आहे. ह्युंडाई कंपनीची या ठिकाणी आलेली गुंतवणूक हेच दर्शवते. काही वर्षांमध्ये झालेली गुंतवणूक पाहिली तर आता छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रिक वाहनांच्यासाठी देशाची राजधानी बनते आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्रामदिन कार्यक्रमात केले.
दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरचे पुराचे पाणी हे पुन्हा उजनीपर्यंत आणून ते मराठवाड्यात आणण्यात येणार आहे. उल्हास खोऱ्याचे ५४ टीएमसी पाणीदेखील मराठवाड्यामध्ये आणण्यात येईल. गोदावरीचे खोरे आहे जे तुटीचे खोरे आहे हे खोरे त्यातली तूट दूर करून यासंदर्भात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पाणी पोहोचवण्याचे काम निश्चितपणे सरकारच्या माध्यमातून केले जाईल. डिसेंबरपर्यंतचा डीपीआर तयार होईल आणि त्यानंतर जानेवारी- फेब्रुवारी मध्ये याची निविदा प्रक्रिया पार पाडली जाईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.
२०२३ मध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची गतीने अंमलबजावणी
छत्रपती संभाजीनगर येथे २०२३ मध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची गतीने अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. घृष्णेश्वर मंदिराला ६१ कोटी रुपये दिले आहेत, तुळजाभवानी मंदिर ५४१ कोटी रुपयांची तरतूद केली तर औंढा नागनाथ आराखड्याला मंजुरी दिली आहे. मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत ९४ बसगाड्या दिल्या असून छत्रपती संभाजीनगरला जवळपास ११५ बसेस दिल्या आहेत. ९१६ अंगणवाड्यांची सुरुवात केली, २६५०० नवीन बचतगट तयार करून त्यामध्ये २.७० लाख महिलांना जोडले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेचे अंतर्गत ९५ कोटींचा निधी वितरित केला. विविध स्मारके, मंदिरे यासाठी २५३ कोटी रुपये दिले, ३१२१ कोटीच्या रस्त्यांची कामे सुरू केली, जी प्रगतीपथावर आहेत. हायब्रिड ॲन्युनिटीमधील ७७१९ कोटींची कामे आपण सुरू केली, बीड जिल्हा परिषदेच्या इमारतीचे ७० टक्के काम पूर्ण केले आहे. जवळपास चार लाख सिंचन विहिरींपैकी ३० हजार विहिरी पूर्ण केल्या आणि १.१४ लाख एवढ्या सिंचन विहिरीचे काम सुरू केले आहे. मंत्रिमंडळाची बैठक ही केवळ एक औपचारिकता नव्हती तर त्यात घेतलेल्या एकेका निर्णयावर कार्यवाही करण्याचे काम सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
लातूरची कोच फॅक्टरी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. जवळपास १४ हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरच नाही तर मराठवाड्याच्या इतर भागात जे आपलं काम चालले आहे ते विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. अहिल्यानगरपासून बीड पर्यंतची रेल्वेचे स्वप्न हे आज पूर्ण करण्याचे काम आपल्या शासनाच्या माध्यमातून होत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कार्यक्रम स्थळी उपस्थित असलेल्या स्वतंत्र संग्राम सेनानींची भेट घेऊन त्यांना मराठवाडा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी मराठवाडा मुक्ती संग्रामात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय, नागरिक, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

