- News
- एक्सक्लुझिव्ह
- मंत्री शिरसाटांच्या राजकारण निवृत्तीच्या संकेतामागचे काय आहे गौडबंगाल?; स्पर्धेत राहणार नसल्याचे सां...
मंत्री शिरसाटांच्या राजकारण निवृत्तीच्या संकेतामागचे काय आहे गौडबंगाल?; स्पर्धेत राहणार नसल्याचे सांगून राजकारणातील शत्रू कमी करण्याचा तर नाही प्रयत्न??
मनोज सांगळे, संपादक, ‘मेट्रोपोलिस पोस्ट’
छत्रपती संभाजीनगर : मंत्री संजय शिरसाट यांनी शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत पुन्हा एकदा दिले आहेत. याआधी ९ फेब्रुवारीलाही त्यांनी तसे संकेत दिले होते. त्यामुळे खरंच त्यांच्या मनात तसे काही सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर, जिल्ह्यातील दोन मोठे नेते एकाच वेळी पुढच्या विधानसभा निवडणुकीत दिसणार नाहीत. हे दुसरे नेते म्हणजे, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार. त्यांनीही यापूर्वी (१३ जानेवारी) पुढची विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्री झाल्यानंतर ९ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित सत्काराला उत्तर देताना मंत्री शिरसाट यांनी तेव्हाही निवृत्तीचे संकेत दिले होते. ते म्हणाले होते, की इतक्यावेळा आमदार होणे सोपं नाही. माझी पहिल्या निवडणुकीतच दमछाक झाली होती. मात्र नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत माणसं जोडत गेलो. कुणाविषयीही द्वेषभाव ठेवला नाही. कुठेतरी थांबले पाहिजे. महाराजांप्रमाणेच भाषण देण्यात पटाईत झालो आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर कदाचित महाराज होईल. लोक पायाही पडतात, तोपर्यंत पाच वर्षे तेवढे राजकारणात राहू द्या.
आतापर्यंतच्या आयुष्यात स्वाभिमानाने लढलो, यापुढेही स्वाभिमानाने जगेल, असे शिरसाट म्हणाले होते. लोक काम का करतात? चांगलं घर बांधता यावं, बायकोला दागिणे घेता यावेत, गाडी घेता यावी म्हणूनच ना? मीही माझ्या बायकोसाठी बंगला बांधला, काय गैर केले. काही जण म्हणतात हे बरोबर नाही. लोकांच्या डोळ्यात येते. पण मी म्हणतो आग लागू द्या त्यांच्या डोळ्यांना. अरे आयुष्यच किती आहे, एवढी काळजी कशाला करायची. सगळं करा, फक्त लोकांचे तळतळाट घेऊ नका, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली होती.
शत्रू कमी करण्याचे प्रयत्न?
मंत्री शिरसाट यांचे संकेत देणे यामागे नक्की काहीतरी गौडबंगाल असल्याचीही चर्चा आहे. स्पर्धेतच राहणार नाही, असे सांगून राजकारणातील शत्रू कमी करण्याचाही हा प्रयत्न असावा, असेही बोलले जात आहे. कारण गेल्या काही दिवसांत शिरसाट हे सातत्याने वादात सापडले आहेत. या वादातून ते कसेबसे बाहेर पडले आहेत. हॉटेल व्हिट्स असो, की जमीन खरेदी, नोटांची बॅग अशा अनेक गोष्टींमुळे मंत्री शिरसाट यांच्याविरुद्ध विरोधकांनी रान पेटवले होते. या सर्व गोष्टींमुळे शिरसाट ही नवी खेळी तर खेळत नाही ना, अशीही चर्चा होत आहे.
सत्तार यांनीही दिले होते निवृत्तीचे संकेत…
आ. अब्दुल सत्तार यांनीही राजकीय निवृत्तीची केलेली घोषणा शिरसाटांच्या संकेतांमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. लोकांना विकास नकोय. फक्त जातीवाद हवा आहे. निवडणुकीत शेवटच्या चार दिवसांत वातावरण बदलून जाते. मी अठरा- अठरा तास काम करतो, तरीही लोकांना त्याचं काही घेणं देणं नाही. जर असेच असेल तर मलाही राजकारणाशी काही देणंघेणं नाही. त्यामुळेच मी ठरवलंय की पुढची विधानसभा निवडणूक लढणार नाही, असा निर्णय सिल्लोडचे आमदार तथा माजीमंत्री अब्दुल सत्तार यांनी १३ जानेवारी २०२५ ला जाहीर केला होता. कदाचित पुढच्या निवडणुकीत सत्तार हे आपल्या पुत्राला उभे करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी आटापिटा करूनही त्यांना मंत्रिपद मिळाले नव्हते. आता सिल्लोडचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी पुत्राचे नाव समोर केले आहे.

