छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : दारू पिऊन मुली, पत्नीला मारहाण करत असल्याने समजावून सांगण्यास गेलेल्या मोठ्या भावासोबत लहान्याने हाणामारी सुरू केली. यात लहान्याने डोक्यात मुसळ घालून मोठ्या भावाची हत्या केल्याची थरारक घटना सिल्लोड तालुक्यातील वडाळी येथे समोर आली आहे. १२ सप्टेंबरला सायंकाळी ही हत्या झाली. मात्र या प्रकरणाची तक्रार पोलिसांत करण्यात आलेली नव्हती. दुःखात असल्याने तक्रार देण्यास उशीर झाल्याचे सांगत मृतकाच्या पत्नीने अजिंठा पोलीस ठाण्यात दीराविरुद्ध पतीच्या हत्येची तक्रार १६ सप्टेंबरला दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या घटनेने सिल्लोड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
फकिरा श्रावण गवळी (वय ४३, रा. वडाळी, ता. सिल्लोड) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. राघो श्रावण गवळी (रा. वडाळी) असे संशयित खुनी भावाचे नाव आहे. रुख्मनबाई फकीरा गवळी (वय ४२, रा. वडाळी ता. सिल्लोड) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या वडाळी येथे गावठाण जागेवर घर बांधून पती फकीरा श्रावण गवळी, ३ मुले अभिषेक (वय २१), अविनाश (वय १९), वैभव (वय १७) यांच्यासोबत राहत होत्या. गावात त्यांचे दीर राघो श्रावण गवळी हे त्यांची पत्नी अर्चना राघो गवळी व त्यांच्या दोन मुलींसह राहतात. त्यांच्या घराशेजारी रुख्मनबाईंची सासू मंजाबाई श्रावण गवळी (वय ७५) यांचे बंद घर आहे.
घरासमोर टिन पत्राची ओसरी कुडामध्ये बांधलेली आहे. रुख्मनबाईंचे पती फकीरा दारू पिण्याच्या सवईचे होते. दीर राघोसुद्धा नेहमी दारू पिऊन त्याची पत्नी व मुलांना मारहाण करत होता. त्यामुळे फकीरा हे राघो याला मुलींना मारहाण करत जाऊ नको, असे समजावून सांगत असे. १२ सप्टेंबरला दुपारी साडेबाराला फकीरा हे दारू पिऊन घरात झोपलेले होते. तासाभरात ते उठले. रुख्मनबाईंनी त्यांना जेवायला दिले. जेवण झाल्यानंतर फकीरा पायी चालत नेहमीप्रमाणे गावात निघून गेले. ते नेहमी दारू पिऊन नेहमी रात्री दहा ते अकरापर्यंत घरी येत असत. मात्र त्यादिवशी संध्याकाळी साडेसातला राघोची पत्नी अर्चना धावतपळत रुख्मनबाईंकडे आली. राघो व फकीरा यांच्यात भांडण चालू आहे. तुम्ही लवकर चला, असे तिने सांगितले. त्यामुळे रुख्मनबाई, लहाना मुलगा वैभव असे तातडीने मोटारसायकलीने राघो याच्या घराकडे आले.
तिथे फकीरा यांच्या तोंडाला मार लागल्याने रक्त येत होते. रुख्मनबाईंनी राघोला रागात विचारले, की तू माझ्या पतीला का मारले, तेव्हा राघो लाकडाची झिलपी घेऊन रुख्मनबाईंवर धावला. फकीरा हे गंभीर जखमी असल्याने रुख्मनबाईंनी मुलासोबत मिळून त्यांना घरी आणले. फकीरा म्हणाले, की माझ्या डोक्यात राघोने काहीतरी मारले आहे. त्यामुळे रुख्मनबाईंनी केस आजूबाजूला करून पाहिले असता कोणतीही जखम दिसली नाही. मात्र त्यांचे तोंडाला मार लागून तोंडातून रक्त येत असल्याने रुख्मनबाईंनी त्यांना धावडा येथे डॉ. आहेर यांच्या दवाखान्यात आणले. डॉक्टरांनी फकीरा यांना इन्जेक्शन देऊन काही गोळ्या लिहून दिल्या. त्यानंतर फकीरा यांना घेऊन रात्री साडेनऊला सर्व जण घरी आले आणि झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी फकीरा उठलेच नाहीत...
१३ सप्टेंबरला सकाळी ८ आठपर्यंतही फकीरा झोपेतून उठले नाही. राघोने फकीरा यांच्या डोक्यात मुसळी मारली होती. ही बाब नातेवाइकांच्या चर्चेतून कळल्यावर रुख्मनबाईंनी लगेचच फकीरा यांना बुलडाणा येथे सिध्दीविनायक हॉस्पीटलमध्ये आणले. तिथे दुपारपर्यंत उपचार करून डॉक्टरांनी आम्हाला खूप खर्च येईल. आम्ही गॅरंटी घेत नाही, असे म्हटल्याने रुख्मनबाईंनी रुग्णवाहिकेतून फकीरा यांना छत्रपती संभाजीनगरच्या फिनिक्स हॉस्पिटलमध्ये रात्री ८ ला दाखल केले. रुग्ण शुध्दीवर आल्यावर आपण त्यांचे ऑपरेशन करू, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १४ सप्टेंबरला सकाळी साडेअकराला डॉक्टरांनी सांगितले की फकीरा मरण पावले आहे. तुम्ही त्यांना घाटी दवाखान्यात घेऊन जा. त्यानंतर घाटी मृतदेह नेण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह घरी आणला. मध्यरात्री १२ ला अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे करत आहेत.