- News
- सिटी क्राईम
- वाळूज MIDC तील युवकाच्या खुनाचा उलगडा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय, डिर्व्होससाठी हट्ट अन्... साडू...
वाळूज MIDC तील युवकाच्या खुनाचा उलगडा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय, डिर्व्होससाठी हट्ट अन्... साडूच निघाला खुनी!!, ३० वर्षीय अमोलच्या खुनामागे समोर आले धक्कादायक कारण
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूजच्या बकवालनगर येथील अमोल एकनाथ बारे (वय ३०) याची तिसगाव शिवारात निर्घृण हत्या करणाऱ्या तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. जालना बसस्थानक परिसरात ही कारवाई बुधवारी (७ जानेवारी) सकाळी करण्यात आली. युवराज कैलास राठोड (वय २०, रा. हनुमाननगर, छत्रपती संभाजीनगर ), प्रमोद भाऊसाहेब वाघचौरे (वय २७) व शुभम पंडीत राठोड (वय २५, दोघे रा. मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. चौथा मारेकरी अल्पवयीन आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोलचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्याला घटस्फोट हवा होता. त्याची पत्नी व मारेकरी युवराजची पत्नी चुलत बहिणी आहेत. युवराज व त्याच्या पत्नीने आपल्या पत्नीला घटस्फोटासाठी राजी करावे, असा तगादा अमोलने युवराजकडे लावला होता. त्याच्या पत्नीला घटस्फोट नको होता. त्यामुळे वाद वाढत गेला. ४ जानेवारीला रात्री साडेनऊच्या सुमारास अमोलने युवराजला कॉल करून शिवीगाळ केली. त्याचा संताप युवराजच्या डोक्यात भरला. त्याने प्रमोद वाघचौरे आणि शुभम राठोड यांना बोलावून घेतले. अमोललाही बोलावून घेतले. दुचाकीवर बसवून तिसगाव शिवारातील अब्बास पेट्रोल पंपासमोरील रस्त्यालगत अंधारात नेऊन अमोलला जबर मारहाण केली. प्रमोदने धारदार चाकूने अमोलच्या छाती, गळा व पाठीत सपासप वार केले. अमोलचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस उपनिरीक्षक शेख सलीम, पोलीस अंमलदार शेख युसूफ, सय्यद चांद सय्यद गुलाब हे कमळापूर येथील तब्लीग इज्तेमात बंदोबस्तावरून रात्री १० ला घरी परतत होते. ओयासिस चौक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाने जात असताना अब्बास पेट्रोलपंपासमोर चौघे अमोलची हत्या करत असल्याचे पाहून त्यांनी धाव घेतली. पोलिसांना पाहून मारेकरी मोटारसायकलींवरून पळून गेले होते. पोलिसांनी अमोलला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पळून जाणाऱ्या मारेकऱ्यांपैकी एकाचा फोटो मोबाइलमध्ये काढण्यात सय्यद चांद यांना यश आले होते. त्या फोटोच्या आधारे, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला.
जालना, अहिल्यानगर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह तब्बल १४ जिल्ह्यांत शोधमोहीम राबविली. मारेकरी सतत ठिकाणे बदलत होते. नव्या सीमकार्डचा वापर करून लोकेशन लपवत होते. परराज्यात पळून जाण्याची त्यांची तयारी होती. तांत्रिक तपासात बुधवारी सकाळी जालना बसस्थानक परिसरात ते आल्याचे कळताच जालना पोलिसांना कळविण्यात आले. जालना पोलिसांनी जिजामाता प्रवेशद्वार परिसरात सापळा रचून हॉटेलवर चहा घेत असतानाच तिघांना अटक केली. जालन्यातील एका ओळखीच्या कॅटरर्स व्यवसायिकाकडून पैसे घेऊन परराज्यात पळ काढण्याचा त्यांचा डाव होता. मात्र पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडला. ही कारवाई जालना पोलिसांच्या मदतीने वाळूज एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, प्रवीण पाथरकर, अंमलदार सय्यद चांद, अरुण उगले यांनी केली. त्यांना जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस उपनिरीक्षक एच. एस. राठोड यांच्या विशेष पथकाने सहकार्य केले. तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेश ठाकरे करीत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
18 Jan 2026 10:39:01
वैजापूर/पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सत्यनारायणाच्या पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी...

