- News
- पॉलिटिक्स
- हरिभाऊ बागडे यांच्या जुन्या कार्यकर्त्यांना आ. अनुराधा चव्हाण डावलतात?, काय आहे राधाकिसन पठाडेंचा आर...
हरिभाऊ बागडे यांच्या जुन्या कार्यकर्त्यांना आ. अनुराधा चव्हाण डावलतात?, काय आहे राधाकिसन पठाडेंचा आरोप...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण या राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या जुन्या कार्यकर्त्यांना सतत डावलत असल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू असते. ही बाब आता थेट चव्हाट्यावर आली आहे. लाडसावंगी गटातून बागडे यांचे खंदे समर्थक असलेले राधाकिसन पठाडे इच्छुक होते. मात्र त्यांना डावलून विजय काळे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पठाडे कमालीचे नाराज झाले. त्यांनी आ. अनुराधा चव्हाण यांच्यावर टीकास्त्र डागले. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची इतक्या दिवसांतील धुसफूसही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, की आ. अनुराधा चव्हाण यांना जुने कार्यकर्ते संपवायचे आहेत. कानाखालच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यायची आहे. पठाडे यांच्या भूमिकेमुळे आधीच नाराज असलेले बागडे यांचे समर्थक यानिमित्ताने पेटून उठण्याची शक्यता लक्षात घेता, आ. अनुराधा चव्हाण यांनी बागडे यांचे सगळे कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याचा दावा केला.
आ. अनुराधा चव्हाण यांनी पठाडे यांना जशास तसे उत्तर दिले असून, लवकरच दूध का दूध, पानी का पानी होईल, असे त्या म्हणाल्या. बागडे यांचे सगळे कार्यकर्ते सोबत असल्याचा दावाही केला. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी संयम बाळगावा. आरोप करणाऱ्यांना सांगू इच्छिते की, पक्षाचे कॅमेरे सगळीकडे लागलेले आहेत. मार्केट कमिटीमध्ये जे घोटाळे करून ठेवले आहेत, त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई होईल, असा प्रहार त्यांनी पठाडे यांच्यावर केला. विशेष म्हणजे, बाजार समितीचा पूर्ण कारभार हरिभाऊ बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पठाडे करत आले आहेत. त्यामुळे बाजार समितीत गैरव्यवहाराचा आरोप करून आ. चव्हाण यांनी नक्की कुणाला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला, असा प्रश्न निर्माण झाला असून, यामुळे भाजपचे जुने कार्यकर्ते अधिकच नाराज होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कधीकाळी थेट हरिभाऊ बागडे यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी अनुराधा चव्हाण या मैदानात उतरल्या होत्या. नंतरच्या काळात भाजपात आल्यावर त्या बागडे यांच्याच राजकीय वारस ठरल्या. ब्युटी पार्लरच्या संचालिका, जिल्हा परिषद सदस्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या अन् विधानसभेच्या उमेदवार, नंतर भाजप कार्यकर्त्या ते आमदार असा प्रवास त्यांचा राहिला आहे. त्यांचा विजय केवळ आणि केवळ राजस्थानचे विद्यमान राज्यपाल हरिभाऊ बागडे उर्फ नाना यांच्या प्रभावामुळेच झाल्याची चर्चा मतदारसंघात असते. बागडे यांचा जनसंपर्क, छोट्या छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत थेट संवाद आणि ओळख, स्वपक्षीय असो की विरोधी पक्षातील कार्यकर्ता त्याचे खरोखरच जनहिताचे काम असेल, तर नानांनी कधीही नकार दिलेला नाही. अनुराधा चव्हाण या त्यांच्या राजकीय वारस म्हणून वावरत असल्या तरी नानांचे गुण मात्र अद्यापही त्यांच्यात उतरले नसल्याची भावना कार्यकर्ते आणि जनसामान्यांमध्ये आहे. परिणामी, सामान्य कार्यकर्त्यांशी अजूनही अनुराधाताई चव्हाण यांची नाळ जुळली नाही, अशी चर्चा होत असते. ती पठाडे यांच्या निमित्ताने बाहेर आली. पती सार्वजनिक बांधकाम विभागातील उच्चपदस्थ अधिकारी असल्याने त्या साई श्रद्धा डेव्हलपर्स या बांधकाम उद्योगाच्या भागीदारही आहेत. त्यांची भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांशी नाळ अद्यापही जुळलेली नाही. त्याचा फटका फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत भाजपला बसला.

