महायुतीतील तिन्ही पक्षांचा छत्रपती संभाजीनगरात सवता सुभा?; स्वतंत्र लढण्याचे मुख्यमंत्र्यांनीच दिले संकेत

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आम्ही एकत्रपणे सामोरे जाणार, असे ठामपणे सांगणारे महायुतीतील नेते आता मात्र स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत देऊ लागले आहेत. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बुधवारी (२२ ऑक्‍टोबर) मुंबईत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना महायुतीतील तिन्ही पक्ष मुंबईत एकत्र तर राज्यातील इतर शहरांत स्वतंत्रपणे लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. यामुळे आता भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष छत्रपती संभाजीनगर महापालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत परस्परांशी दोन हात करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी पार पडणार आहेत. या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. या वेळी त्यांनी महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे केल्यास विरोधकांच्या जागा वाढण्याची शक्यता बोलून दाखवली. यामुळे फक्त मुंबईत तिन्ही पक्ष हातात हात घालून एकत्र महापालिकेची निवडणूक लढतील तर इतर शहरात मात्र स्थानिक परिस्थितीनुसार स्वतंत्रपणे लढतील, असे संकेतही त्यांनी दिले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तब्बल चार वर्षांनंतर होत असून, या काळात घडलेल्या अनेक घडामोडींनंतर भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीने राज्याची सत्ता काबीज केली. ही महायुती मजबूत गठबंधन म्हणून विरोधकांचा सामना करत आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित लढल्यानंतर हे तिन्ही पक्ष महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकाही एकत्रित लढतील, असे सांगण्यात येत होते. तिन्ही पक्षांचे प्रमुख नेतेही अशीच शक्यता व्यक्त करीत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बुधवारच्या वक्तव्यानंतर मात्र मुंबईवगळता इतर शहरात हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातही हे तिन्ही पक्ष एकत्र असल्याने विरोधकांचा सुपडा साफ झाल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. लोकसभेला हे तीन पक्ष एकत्र असल्याने महायुतीचा झेंडा जिल्ह्यात रोवला गेला. विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यात महायुतीचेच सर्व आमदार निवडून आले. त्यामुळे तिन्ही पक्ष एकत्र राहिल्यास स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही त्यांचेच वर्चस्व राहील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, आता स्वतंत्र लढून विरोधकांना एकही जागा मिळू द्यायची नाही, अशा भूमिकेत महायुतीचे नेते दिसत असून याच अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी मुंबई वगळता इतरत्र स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत दिल्याचे मानण्यात येत आहे. अर्थात मुंबई सोडून इतर शहरात स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट

Latest News

कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट
छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात आज, २४ ऑक्टोबरला दुपारी उभ्या कारला अचानक आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला....
यवतमाळ हादरले!‌  मैत्रिणीसोबत यात्रोत्सवात आलेल्या १४ वर्षीय मुलीवर पाशवी लैंगिक अत्याचार!!
मुंबईत काचेच्या उंच इमारतीला भीषण आग!; सुदैवाने २७ जण बचावले, १७ जण होरपळले!! 
पतीच्या वागणुकीत कधीतरी बदल होईल, आशेवर जगत होती २४ वर्षीय तरुणी, तो दिवस उजाडलाच नाही, पण त्या दिवशी जे घडलं ते धक्कादायक...छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा पोलिसांनी ६ जणांविरुद्ध केलाय गुन्हा दाखल
हॉटेल चालवायला दिली, तो सर्व साहित्य घेऊन गायब..., हॉटेलमालकाची चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software