- News
- पॉलिटिक्स
- खैरे म्हणाले, १२ पर्यंत परवानगी द्या; आ. शिरसाट म्हणाले, १ पर्यंत नाचा, सरकार आमचेच!; CP पवार म्हणाल...
खैरे म्हणाले, १२ पर्यंत परवानगी द्या; आ. शिरसाट म्हणाले, १ पर्यंत नाचा, सरकार आमचेच!; CP पवार म्हणाले, कोर्टात आम्हाला उभे राहावे लागते वेळ १० पर्यंतच!!, गणेशोत्सवाच्या समन्वय बैठकीत नक्की काय झालं वाचा…
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (४ सप्टेंबर) सायंकाळी पाचला संत एकनाथ नाट्यमंदिरात पोलीस विभागातर्फे समन्वय बैठक घेण्यात आली. आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, माजी खासदार चंद्रकांत खैरे, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा प्रशासक जी. श्रीकांत, गणेश महासंघाचे संस्थापक पृथ्वीराज पवार, अध्यक्ष ऋषिकेश जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती […]
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (४ सप्टेंबर) सायंकाळी पाचला संत एकनाथ नाट्यमंदिरात पोलीस विभागातर्फे समन्वय बैठक घेण्यात आली. आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, माजी खासदार चंद्रकांत खैरे, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा प्रशासक जी. श्रीकांत, गणेश महासंघाचे संस्थापक पृथ्वीराज पवार, अध्यक्ष ऋषिकेश जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत गणेशोत्सवाच्या मागण्या, समस्यांपेक्षा शहरात वाढलेल्या नागरी समस्यांचा पाढाच अधिक वाचला गेला. यावेळी आ. शिरसाट यांनी रात्री १ पर्यंत गणेशोत्सव झाल्यास काय हरकत आहे, असा सवाल केला असता पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी कोर्टात आम्हाला उभे राहावे लागते. त्यामुळे परवानगी रात्री १० पर्यंतचीच मिळेल, असे निःक्षून सांगितले. वेळेच बंधन पाळण्याचे आवाहन महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनीही केले.
बैठकीत वाहतुकीची समस्या अन् अतिक्रमणांचा विळखा यावर फोकस राहिला. गोपाळ टी पॉईंट, सेव्हनहिल ते गजानन महाराज मंदिर, शहानूरमिया दर्गा चौक, गोदावरी टी पॉईंट, सूतगिरणी चौक, उस्मानपुरा, भडकल गेट, गुलमंडी, शहागंज, बुड्ढीलेन परिसर, जालना रोड, शिवाजीनगर, बायपासवरील सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्यावर बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. अतिक्रमण, हातगाड्यांना आवर घाला, रस्ते मोकळे करा, अशी विनंती व्यापारी, गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी वाहतूक विस्कळीत झाल्याचे मान्य करत पोलीस आयुक्तांनी मला परवानगी द्यावी. ५० माजी सैनिकांना उभे करून प्रमुख चौकात वाहतूक नियमन करायला लावतो. ऑनलाईन दंडाची भीती नसल्याने जागेवर दंड ठोठावतो. एका आठवड्यात मी ही मोहीम सुरू करून वाहतूक नियमनात तुम्हाला मदत करतो, असा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे दिला. त्याला लगेच पोलीस आयुक्त पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सोबत मिळून वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी तयारी दाखवली. मुंबई, ठाण्यात मनपातर्फे ट्रॅफिक वॉर्डन देतात. तुम्ही ५० ऐवजी २०० माजी सैनिक ट्रॅफिक वॉर्डन द्या. आम्ही त्यांना योग्य प्रशिक्षण, गणवेश देतो, ते निश्चित आम्हाला उपयोगात येतील. वाहतूक समितीची सातत्याने बैठक घेऊन सर्व मिळून उपाययोजना करू, असे पोलीस आयुक्त म्हणाले.
समन्वय बैठकीकडे भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते नव्हते. पोलिसांनी सर्व भाजप नेते, पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिले होते. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळही नव्हते. बैठकीला महावितरणचा एकही अधिकारी नव्हता.
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गणेशोत्सवाची वेळ १२ वाजेपर्यंत वाढवून मागितली. त्यावर शिरसाटांनी त्यांना कोपरखळ्या मारल्या. खैरे साहेब, या टायमाला तुम्ही बिनधास्त राहा. रात्री १२ काय १ वाजेपर्यंत नाचा. मी कमिशनर साहेबांना सांगतो कानाडोळा करायला. अरे सरकार कोणाचं आहे आणि हे संजय शिरसाट बोलतोय, काही दम आहे की नाही, असे आ. संजय शिरसाट यांनी खैरेंना म्हणाल्या. त्यावर हास्यकल्लोळ उडाला. ९ मिनिटांच्या भाषणात शिरसाटांनी तीन वेळा खैरेंकडे पाहत कोपरखळ्या मारल्या अन् इतरांच्या भाषणादरम्यान दहा-पंधरा मिनिटे दोघांत गुफ्तगूही झाल्याचे दिसले. खैरे यांनी भाषणात ठिकठिकाणी खोदलेल्या रस्त्यांचा मुद्दा मांडला. जैस्वाल व शिरसाट यांचा सन्माननीय आमदार असा उल्लेख केला.
गणेशात्सवाच्या समस्या फोकस…
अस्वच्छता, खड्डे, लोंबकळणाऱ्या वीजतारा, मुख्य विसर्जन मिरवणुकीदरम्यान सिंगल एन्ट्री, एक्झिट ठेवा. महिलांसाठी फिरते शौचालय, रुग्णवाहिकांची संख्या वाढव, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यावर बैठकीत चर्चा झाली. प्रशासनाने त्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. शुक्रवारी गणेश महासंघ, पोलीस आयुक्त व मनपा प्रशासक मिरवणूक मार्गाची पाहणी करतील, असे सांगण्यात आले.
यंदा असं आहे नियोजन…
९०० सार्वजनिक गणेश मंडळे असणार आहेत. १६ ठिकाणी गणेशमूर्तींची विक्री होईल. १४ गणेश विसर्जन स्थळे असतील. ६१ जातीय संवेदनशील ठिकाणे घोषित केली आहेत.

