- News
- एक्सक्लुझिव्ह
- Political Exclusive : सावे-कराडांनी मराठा समाजाला दूर लोटल्याचा आरोप, शिंदे गटाची मुत्सद्दी 'खेळी' य...
Political Exclusive : सावे-कराडांनी मराठा समाजाला दूर लोटल्याचा आरोप, शिंदे गटाची मुत्सद्दी 'खेळी' यशस्वी होणार का?
छत्रपती संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीत भाजप मंत्री अतुल सावे आणि खा. भागवत कराड यांनी आपल्या जवळच्यांना आणि आयातांना उमेदवारी देताना आपल्याच पक्षातील मराठा समाजाच्या इच्छुकांना दूर ठेवल्याचा आरोप झाला. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मात्र मराठा समाजाच्या उमेदवारांच्या पदरात उमेदवारीचे भरभरून दान टाकले. आता यातून कोणत्या पक्षाची खेळी यशस्वी ठरते, हे येत्या सोळा तारखेला कळेलच...
आता दोघांकडूनही धावाधाव...
उमेदवारी वाटप करताना केलेल्या मनमानीमुळे आता सावे आणि कराड यांनी आप्तस्वकीय आणि समर्थक निवडून आणण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे. यातूनच ओबीसी समाजाचे असलेले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना वारंवार शहरात आमंत्रित केले जात आहे. मात्र बावनकुळे यांचे नेतृत्व सर्वसमावेशक नसल्याने त्याचा खूप फायदा पक्षाला होण्याची शक्यता कमी दिसत आहे.
शिंदे गटाची जबरदस्त खेळी
राज्याच्या सत्तेत त्यांचाच सहकारी असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाने मात्र छत्रपती संभाजीनगरात मराठा समाजाला जवळ करण्याची खेळी खेळली आहे. महापालिका निवडणुकीच्या आधी शिंदे गटातील नेते पालकमंत्री संजय शिरसाट आणि पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्यात मोठा वाद झाला होता. अगदी शिरसाट यांनी जंजाळ यांना उद्देशून ‘जायचे तिकडे जा' अशी भाषा देखील वापरली होती. खरे तर कोणत्याही सत्ताधारी पक्षात असे वाद होतात, त्यावेळी पक्षश्रेष्ठी मंत्र्यांची बाजू उचलून धरतात. छत्रपती संभाजीनगरात मात्र एकनाथ शिंदे यांनी मात्र या वादावर तोडगा काढताना जंजाळ यांचे महत्त्व कुठेही कमी होऊ दिले नाही. त्यामुळे पक्षातील जंजाळ यांचे महत्त्व वाढले. महापालिका निवडणुकीचे उमेदवारी वाटप करतानाही त्यांच्या शब्दाला महत्त्व दिले गेले. त्यामुळे शिंदे गटात मराठा नेतृत्वाची काळजी घेतली जाते, असा संदेश मतदारांपर्यंत गेला. एकीकडे उमेदवारी वाटपात सावे व कराड हे भाजप नेते मराठा समाजाला डावलत असताना त्या पक्षात नाराज झालेल्या मराठा निष्ठावंतांना शिरसाट व जंजाळ यांनी शिंदे गटात आणून उमेदवारीही दिली. एका अर्थाने शिंदे गटात आपल्या समाजाला आणि समाजाच्या नेत्यांना महत्त्व असल्याचा महत्त्वाचा संदेश मराठा समाजामध्ये गेला.
मराठा समाजाला आधार
निष्ठावंतांना न रूचलेली सावे, कराडांची भूमिका, दुसरीकडे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची मुस्लिम मतांसाठी सुरू असलेली धडपड, एमआयएमचे मुस्लिम मतांवरील पूर्णत: अवलंबित्व, काँग्रेसचे जवळपास संपलेले अस्तित्व या साऱ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा शिंदे गट एवढा एकच पक्ष मराठा समाजाला जवळचा वाटू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

