अतिवृष्टीने हाहाकार : ४ चिमुकले पुरात वाहून गेले, सराला बेटावर अडकले २२० जण, ४० हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. वैजापूर, कन्नड तालुक्यातील ३ चिमुकले पुरात वाहून गेले, तर एक बालिका बेपत्ता आहे. गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्‍यातील गोदाकाठची ४० हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. वैजापूर, गंगापूर या तालुक्‍यांतील पुरात अडकलेल्या १०० पेक्षा जास्त जणांची बोटीच्या साह्याने सुटका करण्यात आली. ४० घरे पडली असून, ९ हजार जणांना घर सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले. वैजापूर तालुक्यातील सराला बोटाला पाण्याने वेढा दिल्याने संपर्क तुटला आहे. २२० जण बेटावर अडकले आहेत. 

वैजापूर तालुक्यातील कविटखेडा शिवारात गौरव कृष्णा शिंदे (वय १४) हा लोणी- बोलठाण मार्गावरील पुलावरून वाहून गेला. तो सोमवारी (३० सप्टेंबर) सायंकाळपर्यंत सापडला नव्हता. अंचलगाव (ता. वैजापूर) येथे राज गुलाब ब्राह्मणी (वय १०, मूळ रा. मध्यप्रदेश, ह. मु. अंचलगाव) हा मजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील मुलगा ओढ्याच्या पाण्यात वाहून गेला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह मिळून आला. कन्नड तालुक्‍यातील पिशोर येथे श्रावण विकास मोकासे (वय १०) हा अंजना नदीवरील पुलावर पूर पाहण्यासाठी सोमवारी दुपारी ३ ला गेला असता तोल जाऊन नदीत पडला आणि वाहून गेला. संध्याकाळपर्यंत तो मिळून आला नाही. निपाणी (ता. कन्नड) येथील प्रांजल प्रकाश कदम (वय २) ही चिमुकली रविवारी सायंकाळी शेतातील घरासमोर खेळत होती. घराजवळून वाहणाऱ्या चिमणदडी नदीत ती वाहून गेल्याचा अंदाज आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत ती मिळून आली नाही.

कृषी विभागाचा आकडा : दीड लाख हेक्‍टरवरील पिकाचे मातेरे
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवरील पिकांचे मातेरे झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. कपाशी, सोयाबीन, मका, बाजरी, फळबागांचे प्रामुख्याने नुकसान झाले आहे. ४२ गावांत पुराचे पाणी शिरल्याने ४० पेक्षा जास्त घरे कोसळली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गोदावरी नदीची लांबी ६० किलोमीटर असून, गोदाकाठची सर्व पिके पाण्याखाली गेली. जायकवाडी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पैठण शहरासह ११ गावांत पाणी शिरले. यात नागरिकांचा संसार भिजला आहे.

सराला बेटावर सर्व जण सुखरुप : रामगिरी महाराज
वैजापूर तालुक्‍यातील सराला बेटाला गोदावरी नदीच्या पाण्याने वेढा घातला. त्‍यामुळे बेटाचा संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या वांजरगाव, नागमठाण, अव्वलगाव, चेंडूफळ, बाजाठाण, देवगाव शनी, सावखेड गंगा आदी गावांत पाणी शिरल्याने घरे, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुरात अडकलेल्या ६५ जणांना वाचविण्यात यश आले. ४९९ जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सराला बेटावर अडकलेले २२० जण सुरक्षित असल्याची माहिती मठाधिपती रामगिरी महाराज यांनी दिली. गंगापूर तालुक्‍यातील गोदाकाठच्या नेवरगाव, हैबतपूर, म्हसोबावाडी, अगरकानडगाव, ममदापूर, बगडी आणि जामगाव या गावांना पुराचा वेढा पडला होता. यात ३० घरांची पडझड झाली. पुरात अडकलेल्या ५० जणांची सुटका करण्यात यश आले. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव

Latest News

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर पंचायत समिती शिंदे गटाने बिनविरोध ताब्यात घेतली. शिंदे गटाच्या वंदना बाळू...
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
गंगापूर पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे राजेश्वर हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
सिल्लोडच्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!; सभापतिपदी अनिता बनकर, उपसभापतीपदी भगवान आहेर
पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software