- News
- जिल्हा न्यूज
- गोदेने पात्र सोडले, पैठणमध्ये पाणी घुसले!; हजारावर रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले
गोदेने पात्र सोडले, पैठणमध्ये पाणी घुसले!; हजारावर रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले
हर्सूल तलाव तुडूंब; वाळूज एमआयडीसीतील अनेक कंपन्यांत पाणी शिरले
पैठण/छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी गोदावरी नदीपात्रात सोडल्याने महापूर आला. पैठण शहरात तब्बल १९ वर्षांनंतर पाणी घुसले आहे. जायकवाडी धरणाच्या सर्व २७ दरवाजांतून टप्प्याटप्प्याने रात्री ११ नंतर ३ लाख सहा हजार क्युसेक पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात येत आहे. पैठण शहरासह आसपासच्या ११ गावांतील रहिवाशांचे स्थलांतर करण्यात येत आहे. यापूर्वी २००६ मध्ये अशी परिस्थिती उद्भवली होती. अर्धे शहर पाण्याखाली गेले होते.
छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे हर्सूल तलाव तुडूंब भरला आहे. यामुळे १४ वॉर्डांचा पाणीप्रश्न वर्षभरासाठी मिटला आहे. पूर आल्याने खाम नदीजवळ राहणाऱ्या वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरात ५८ तर जिल्ह्यात ११० मि. मी. पाऊस झाला आहे.
वाळूज एमआयडीसी शहरात शिरले पाणी
अतिवृष्टीमुळे वाळूज एमआयडीसीतील अनेक कंपन्यांत पाणी शिरले. मे मॅट्रिक्स लाइफ सायन्स, हिंदुस्थान कंपोजिट, मीनाक्षी ॲग्रो, महेश इंडस्ट्रीज, राज बोर्डे मील या कंपन्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ए सेक्टरमध्ये रस्त्यालगत खोदलेल्या नाल्यांची कामे अर्धवट सोडलेली असल्याने पाणी रस्त्यावरून १५ ते २० कंपन्यांत शिरले. रविवारी २५ ते ३० टक्के कामगार कामावर आले नव्हते. याचा परिणाम उत्पादनावर झाला. (याआधीची बातमी : Special Report : जिल्ह्यात मुसळधार! ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी, ३५४ नागरिकांची पुराच्या वेढ्यातून सुटका; प्रशासन सतर्क, मुख्यमंत्री फडणवीस जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात - Chhatrapati Sambhaji Nagar City News )

