- News
- सिटी डायरी
- छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जैन समाजाचा मूक मोर्चा, जाणून घेऊ नेमका काय आहे वाद...
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जैन समाजाचा मूक मोर्चा, जाणून घेऊ नेमका काय आहे वाद...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पुण्यातील सेठ हिराचंद नेमचंद (एचएनडी) होस्टेल आणि भगवान महावीर जिनालयाची जागा विश्वस्तांनी विक्रीसाठी काढल्याचा वाद आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचला आहे. विश्वस्तांच्या या कृतीमुळे देशभरातील जैन समाजबांधवांत संतापाची लाट उसळली आहे. सरकारचे या प्रकरणात लक्ष वेधण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आज, २७ ऑक्टोबरला सकाळी १० ला मूक मोर्चाचे आयोजन केले आहे.
पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील सेठ हिराचंद नेमचंद दोशी मेमोरियल ट्रस्ट (एसएचएनडी ट्रस्ट) आणि गोखले लँडमार्क्स एलएलपी यांच्यातील व्यवहार हा मुख्यतः ट्रस्टच्या तीन एकर जागेच्या विक्रीचा आहे. या जागेवर सेठ हिराचंद नेमचंद दोशी जैन वसतिगृह, ६५ वर्षे जुने भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर आणि मैदान, सांस्कृतिक हॉल आदींचा समावेश आहे. हा ट्रस्ट १९५८ मध्ये गरीब जैन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालवण्याच्या उद्देशाने स्थापन झाला होता. चॅरिटी कमिशनरनी ४ एप्रिल २०२५ रोजी ट्रस्टला ही जागा गोखले लँडमार्क्स एलएलपी या बांधकाम कंपनीला विकण्याची परवानगी दिली. विक्री करार १५ मे २०२५ रोजी झाला आणि विक्री डीड ८ ऑक्टोबर २०२५ रोजी नोंदवले गेले. गोखले लँडमार्क्स एलएलपीच्या म्हणण्यानुसार, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा व्यवहार झाला आहे. ट्रस्टच्या उद्देशाला अनुरूप असा हा पुनर्विकास आहे. ट्रस्टच्या ट्रस्टींनींही यामध्ये निधीचा दुरुपयोग नसल्याचे आणि नवीन वसतिगृह ट्रस्टच्या तत्त्वांनुसार चालवले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सकल जैन समाजाच्या आरोपानुसार, विश्वस्तांनी धर्मादाय आयुक्तांना चुकीची माहिती दिली. इमारत जीर्ण झाली आहे असे सांगून जमीन विकण्याचा प्रयत्न केला आहे. जागेवरील ६५ वर्षांचे जुने जैन मंदिर दुर्लक्षित करण्यात आले आणि आता ते मालमत्तेसोबत गहाण ठेवले आहे. मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असतानाही, विश्वस्तांनी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी विक्री करार पूर्ण केला आणि बिल्डरने मालमत्ता गहाण ठेवून कर्जही घेतले.
विश्वस्तांचे म्हणणे...
ट्रस्टला काही व्यक्ती आणि गटांकडून खोट्या आरोपांना आणि बदनामीला सामोरे जावे लागत असून, यातील काही लोकांचा ट्रस्टशी कोणताही अधिकृत संबंध नाही. काही आंदोलकांनी चुकीची माहिती पसरवली आहे आणि धार्मिक भावना भडकवल्या आहेत. जैन समाजात मंदिराची तोडफोड केली जाईल, अशी अफवा पसरवली जात आहे. मंदिर सध्याच्या ठिकाणी अबाधित राहील. नवीन होस्टेल खूप मोठे आणि अधिक सुसज्ज असेल, असा दावा ट्रस्टने केला आहे. चुकीची माहिती पसरवणाऱ्या आणि ट्रस्टला बदनाम करण्याचा किंवा ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे विश्वस्तांनी म्हटले आहे.
वाद वाढला...
या प्रकरणात धर्मदाय आयुक्त, विश्वस्त मंडळ आणि सरकारच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर १३ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. जैन समाजाने केलेल्या आरोपानुसार, बोर्डिंगची सुमारे ३ हजार कोटींची जमीन केवळ २३० कोटी रुपयांना विकण्यात आली. गोखले लँडमार्क्स एलएलपी कंपनी पुनर्विकासासाठी खास ओळखली जाते. या कंपनीत गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी असल्याची चर्चा पुण्यात आहे.

