- News
- सिटी क्राईम
- पैठण गेट भागातील ११८ अतिक्रमणांवर चालला बुलडोझर!, आज पडेगाव रोड-एमजीएम गोल्फ क्लब रस्त्यावर पाडापाडी...
पैठण गेट भागातील ११८ अतिक्रमणांवर चालला बुलडोझर!, आज पडेगाव रोड-एमजीएम गोल्फ क्लब रस्त्यावर पाडापाडी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणगेटजवळ झालेल्या युवकाच्या खुनामुळे ऐरणीवर आलेल्या या भागातील अतिक्रमणांचा प्रश्न अखेर महापालिकेने बुधवारी (१९ नोव्हेंबर) आक्रमकपणे सोडवला. पैठण गेट, सब्जीमंडी परिसरातील मुख्य रस्ते मोकळे करताना ११८ हून अधिक दुकाने, निवासस्थानांवर बुलडोझर चालवला. सब्जीमंडीत ९ मीटर म्हणजेच ३० फूट रूंद झालेला रस्ता पाहून सारेच आश्चर्यचकीत झाले आहेत. आज, २० नोव्हेंबरला पडेगाव रोड ते एमजीएम गोल्फ क्लबपर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे पाडण्यात येणार आहेत. हा रस्ता १०० फूट रूंद आहे.
महापालिकेने पैठण गेट पार्किंगच्या पूर्व दिशेला इमारत बांधली होती. या इमारतीत आठ दुकाने होती. दुकानांवर ३ कुटुंबांचे अनेक वर्षांपासून अनधिकृत वास्तव्य होते. ही बाब कारवाईदरम्यान समोर आल्यानंतर पूर्ण इमारतच जमीनदोस्त करण्यात आली. व्यावसायिक दृष्टीकोनातून ही इमारत बांधण्यात आली होती. ८ व्यापारी व्यवसायही करत होते. ही पूर्ण इमारतच रस्त्यात येत असल्याचे लक्षात आल्यावर दोनच मजले बांधून तिसऱ्या मजल्याचे बांधकाम अर्धवट सोडण्यात आले होते.
सनी कॉर्नरचा कारनामा
महापालिकेने ११० व्यापाऱ्यांना नोटिसा देऊन मालकीहक्काची कागदपत्रे, बांधकाम परवानगीची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिला होते. मात्र केवळ चार ते पाच मालमत्ताधारक समोर आले. अन्य मालमत्तधारकांकडे कागदपत्रेच नव्हती. त्यामुळे कारवाईला वेग आला. पैठण गेटच्या कोपऱ्यावरील सनी कॉर्नर ही इमारत मालक न्यायालयात गेल्याने वाचली. त्याच्याकडे बांधकाम परवानगी आहे, मात्र भोगवटा प्रमाणपत्र नाही. नव्या विकास आरखाड्यात ही इमारत बाधित होत असून, पार्किंगसाठी जागा नाही, वरचा मजला अनधिकृत आहे. त्यावर धोकादायक होर्डिंगही लावले आहे, हे विशेष.
हर्सूलमध्ये मालमत्ताधारकांचे उपोषण सुरू
पैठणगेट भागात ज्या आक्रमक आणि तत्परतेने कारवाई करण्यात आली ती पाहून पोटात गोळा आलेल्या हर्सूल गावातील बाधित मालमत्ताधारकांनी बुधवारी सायंकाळी ७ ला एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले. हर्सूल गावातील मुख्य रस्ता २०० फूट रूंद करण्यात येणार असून, त्यात ज्यांच्या मालमत्ता बाधित होत आहेत, त्यांना त्या काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र आधी भूसंपादन करा, अशी मागणी मालमत्ताधारकांनी केली आहे.

