- News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- अरविंद देशमुखांसारखे सर्वसमावेशक नेतृत्व पुढे आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत; आमदार अर्जुन...
अरविंद देशमुखांसारखे सर्वसमावेशक नेतृत्व पुढे आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत; आमदार अर्जुन खोतकर यांचे प्रतिपादन, मराठा क्रांती मोर्चा व सामाजिक संघटनांतर्फे अरविंद देशमुख यांचा गौरव
जालना (विशेष प्रतिनिधी) : आजच्या गढूळ सामाजिक वातावरणात अठरापगड जातींना सोबत घेऊन फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार आणि कृतीचा सेतू उभारणारे सर्वसमावेशक नेतृत्व म्हणजे अरविंद देशमुख, असे गौरवोद्गार आमदार अर्जुन खोतकर यांनी काढले. अशा सर्वसमावेशक नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी ग्वाही देत अरविंद देशमुख यांना स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेत प्रतिनिधित्व देण्याबाबत विविध सामाजिक संघटनाच्या वतीने मराठा सेवा संघाचे सोपानराव तेलगड केलेल्या मागणीच्या अनुषंगाने बोलताना आपली काही अडचण आणि हरकत नाही. भाजपाचे भास्करराव दानवे यांनीही यासाठी आपला अधिकार वापरावा, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना अरविंद देशमुख भावनिक झाले. ते म्हणाले, स्व. अण्णासाहेब पाटील यांनी १९८० साली हमाल-मापाडी आणि अठरापगड जातीला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी मराठा महासंघाची स्थापना केली. त्यांच्या शिकवणीप्रमाणेच मी आणि माझे सहकारी कार्य करत आहे. आज या सन्मानामुळे माझ्या घरच्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या प्रेमाची ऊब जाणवली. मी कुठल्याही परिस्थितीत मराठा महासंघाचे समाजकार्य सोडणार नाही. राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारीचा उपयोग मी सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठीच करणार आहे. खुर्ची मिळाली तरी मराठा महासंघ कधीच सोडणार नाही, ही माझी शपथ आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अशोक पडूळ यांनी केले. त्यांनी सांगितले, की अरविंद देशमुख यांची मराठा महासंघातील कारकीर्द तब्बल २२ वर्षांची असून, गेली १७ वर्षे ते अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्यामुळेच आज माझी ओळख असून माझे ते सामाजिक गुरु आहेत, असे ते म्हणाले. या वेळी तब्बल १८ सामाजिक आणि सर्वधर्मीय संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे दिव्यांग बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशमुख यांनी त्यांच्या हक्कांसाठी वेळोवेळी आवाज उठवून दिल्याबद्दल त्यांनी या कार्यक्रमात कृतज्ञतेने शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय देठे यांनी केले. आभार शुभम टेकाळे यांनी मानले. संपूर्ण जालना जिल्ह्यातून मराठा समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

