- News
- पॉलिटिक्स
- Political Exclusive : राजकारणात नवखे असले तरी बंधू आ. बोरनारेंचे पाठिशी बळ, घराणेशाहीच्या टीकेवर मात...
Political Exclusive : राजकारणात नवखे असले तरी बंधू आ. बोरनारेंचे पाठिशी बळ, घराणेशाहीच्या टीकेवर मात करून संजय बोरनारे घडवतील इतिहास?
छत्रपती संभाजीनगर (मनोज सांगळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर नगरपालिकेवर २५ वर्षे वर्चस्व राखणाऱ्या डॉ. दिनेश परदेशी यांच्यासमोर शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय बोरनारे हे नवखे असले तरी त्यांच्या पाठिशी आ. रमेश बोरनारे यांचे पाठबळ आहे. आ. बोरनारे यांनी शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना संधी देण्याऐवजी घरातच भावाला नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून संधी दिली. त्यामुळे घराणेशाहीबद्दल टीका होत असताना, या टीकेवर मात करून संजय बोरनारे नगरपालिका ताब्यात घेऊन इतिहास घडवणार का, अशी चर्चा सध्या शहरात सुरू आहे.
वैजापूरमध्ये महाविकास आघाडी एकसंध दिसून येत आहे. भाजप- शिंदे गटाच्या भांडणात संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने काँग्रेसनेही जोरदार तयारी केली आहे. त्यांनी नगराध्यक्षपदासाठी सुभाष गायकवाड यांना उभे केले आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा एक प्रभावी गट डॉ. परदेशी यांच्या पाठिशी होता, तो याही निवडणुकीत पाठिशी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची झुकलेली भूमिका आणि अलीकडेच मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये झालेले प्रवेश या जमेच्या बाजू आहेत.
शिंदे गटाच्या नेत्याची खुमखुमी...
स्वतंत्र निवडणूक लढवत असताना समोर मित्र पक्ष आहे, विरोधक नाही, हे लक्षात ठेवूनच निवडणूक लढायची, असे भलेही भाजपने ठरवले असेल, पण शिंदे गटाच्या नेत्यांची खुमखुमी वारंवार समोर येत आहे. खुलताबादमध्ये शिंदे गटाचे सहसंपर्कप्रमुख माजी आमदार आण्णासाहेब माने यांनी रविवारी (२३ नोव्हेंबर) प्रचारादरम्यान भाजपाला धडा शिकविण्याची भाषा केली. नगर परिषद निवडणुकीत खुलताबादमध्ये भाजपा, अजित पवार गट, शिंदे गट हे महायुतीतील मित्रपक्ष आमनेसामने ठाकले आहेत. भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी परसराम बारगळ, शिंदे गटाकडून बाबासाहेब बारगळ आणि अजित पवार पक्षाकडून माजी नगराध्यक्ष हाजी अकबर बेग मैदानात आहेत. या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटात प्रमुख लढत मानली जात आहे. अण्णासाहेब माने आक्रमकपणे भाजपवर टीका करत आहेत. त्यांचा राग प्रामुख्याने आ. प्रशांत बंब यांच्यावर आहे. तो या निवडणुकीत ते काढताना इतके विसरले आहे, राज्यात आपण भाजपसोबत सत्तेत आहोत, याचाही विसर त्यांना पडला आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेताना माने यांनी भाजपच्या स्वार्थीपणामुळे महायुती झाली नसल्याचे टीकास्त्र सोडले.

