- News
- जिल्हा न्यूज
- वैजापूर, सिल्लोड, पैठण तालुक्यात ३ अपघातांत ३ जणांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी
वैजापूर, सिल्लोड, पैठण तालुक्यात ३ अपघातांत ३ जणांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी
वैजापूर/सिल्लोड/पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर, सिल्लोड आणि पैठण तालुक्यात झालेल्या ३ अपघातांत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन घटना हिट ॲन्ड रनच्या असून, बळी घेतल्यानंतर वाहने पसार झाली आहेत. पोलीस या वाहनांचा शोध घेत आहेत.
टेम्पो उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, तर चौघे जखमी झाले. ही दुर्घटना गुरुवारी (२० नोव्हेंबर) सकाळी पावणेदहाला वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला परिसरातील दत्त मंदिराजवळ घडली. कापूस भरण्यासाठी मजुरांना घेऊन टेम्पो जात होता. आयान सिराज शेख (वय १६, रा. शिऊर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कांतीलाल काशिनाथ गाडेकर (वय ४०), आशिष शांतीलाल गाडेकर (वय २५), शाहरुख गफार पठाण (वय २६) व नदीम गफ्फार पठाण (२०, सर्व रा. शिऊर) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. शिऊर बंगला येथून टेम्पो (क्र. एमएच १७ एक्यू ११५०) कन्नडला जात होता. अचानक टेम्पोच्या समोरील बंपर तुटले आणि टेम्पोच्या चाकाखाली अडकले. त्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि टेम्पो उलटला. गंभीर जखमींना नागरिकांनी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल केले.
छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात अज्ञात वाहनाने ट्रकचालकाला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. व्हीएमएम कुमार मामलीपल्ली (वय ४९, आंध्र प्रदेश) असे मृत्यू झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (२० नोव्हेंबर) सकाळी पावणे अकराला घडली. अपघातानंतर घाटातील वाहतूक १ तास ठप्प झाली होती. मामलीपल्ली जळगावकडून आंध्रप्रदेशकडे ट्रक (क्र. एपी १६ टीजे ४६६६) घेऊन जात होते. अजिंठा घाटात ट्रक नादुरुस्त झाल्याने ते खाली उतरले अन् त्याचवेळी कोणते तरी सुसाट वाहन त्यांना चिरडून गेले. त्यांचा मृतदेह अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात पोलिसांनी आणला. अजिंठा पोलिसांनी जेसीबीद्वारे अपघातग्रस्त वाहन बाजूला केले. तासभराने या मार्गावरील वाहतुक सुरळीत झाली. वाहतुकीच्या कोंडीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे याही अडकून पडल्या होत्या. वनविभागाच्या अटी रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
पैठण : दुचाकीस्वाराला उडवून अज्ञात वाहन पसार, जागीच मृत्यू
पाचोड- पैठण रस्त्यावरील लिंबगाव फाट्यावर (ता. पैठण) अज्ञात वाहन दुचाकीस्वाराला उडवून पसार झाले. दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (२० नोव्हेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. भीमराव रामचंद्र हरे (वय ४०, रा. वडीगोद्री, ता. अंबड, जि. जालना) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ते गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दुचाकीने पैठणला खासगी कामासाठी गेले होते. काम आटोपून रात्री आठच्या सुमारास गावाकडे परतत होते. लिंबगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी हरे यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

