छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बीड बायपास भागातील अलोकनगरातील कॅपीटल ग्रोथ मार्केटिंग कंपनीने गुंतवणुकीवर साडेबारा टक्क्यांनी दर महिन्याला परतावा देण्याचे आमिष दाखवून ७ ठेवीदारांना तब्बल ४४ लाख रुपयांना गंडा घातला आहे. सातारा पोलिसांनी एका ठेवीदाराच्या तक्रारीनंतर कंपनीमालक आणि त्याच्या कुटुंबातील ३ जणांविरुद्ध आज, ३१ ऑगस्टला गुन्हा दाखल केला आहे.
कंपनीचा संचालक राजेंद्र भानुदास बरडे, त्याची पत्नी निर्मला राजेंद्र बरडे, मुलगा विशाल राजेंद्र बरडे, मुलगी अश्विनी राजेंद्र बरडे (सर्व रा. तनीश होम, आळंदी रोड दिघी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मुबारक बिन हबीब अलजाबरी (वय ४३, रा. रहेमानिया कॉलनी, किराडपुरा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांचा गॅरेजचा व्यवसाय आहे. ओळखीचे असलेल्या राजेंद्र भानुदास बरडे यांनी त्यांना कॉल करून बीड बायपासला भेटण्यास बोलावले. सांगितले की, मी नारायणगाव (ता. पैठण) येथील असून माझे स्वतःचे घर आहे. रोड लागतच माझी बागायती शेतजमीन आहे. सध्या आळंदी (पुणे) येथे माझी कॅपिटल ग्रोथ मार्केटिंग कंपनी आहे. त्यानंतर बरडे यांनी ते व त्यांचे कुटुंबीय करत असलेल्या शेअर मार्केट बिझनेसबद्दल माहिती सांगितली. त्यांनी सांगितले की, मी आता माझा बिझनेस वाढवत असून मी पिसादेवी रोडला देखील एक फ्लॅट घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा कॅपिटल ग्रोथ मार्केटिंग कंपनी सुरुवात करत आहे. त्यामुळे सध्या व्हिजन सिटी फ्लॅट ओनर कॉ-ऑफ सोसायटी, कांचनवाडी येथे फ्लॅट घेऊन राहत आहे. मुलगा विशाल बरडे देखील मला कामात मदत करतो. तोदेखील शेयर मार्केटिंगमध्ये मोठ्या उलाढाल करत असतो, असे सांगितले.
लोकांनासुद्धा नफा करून देतो, असे आमिष दाखवले. त्यानंतर राजेंद्र बरडे व त्यांचा मुलगा हे मुबारक यांना भेटण्यासाठी त्यांच्या एन ४ सिडको येथील वर्कशॉपवर आले. त्यांनी त्यांच्या नवीन चालू केलेल्या स्कीमबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, आम्ही दहा हजार रुपयांपासून इन्व्हेस्टमेंट करण्यास सुरुवात केली आहे. माझा मुलगा ट्रेडिंग करून त्याचा परतावा प्रती दिन १ टक्क्यांप्रमाणे एक आठवड्यात देत आहे. त्यांच्या या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवून मुबारक यांनी त्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी २० हजार रुपये फोन पेद्वारे दिले. त्याचा परतावा त्यांनी प्रति दिन १ टक्क्यांप्रमाणे प्रत्येक आठवड्यास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर राजेंद्र भानुदास बरडे यांनी नवनाथ हॉटेलमध्ये मीटिंग ठेवली. तेव्हा त्यांनी त्यांची पत्नी व मुलगी यांचीदेखील ओळख मुबारक यांना करून दिली. निर्मला बरडे यांनी सांगितले, की मी फंड मॅनेजमेंटचे (व्यवस्थापन) काम बघते. मुलगी अश्विनी बरडे हिने देखील स्वतःची ओळख करून देताना सांगितले की, मी कॅपिटल ग्रोथ कंपनीमध्ये ट्रेडिंगचे व कंपनीचे CEO म्हणून काम बघते. आम्ही सर्व व्यक्ती घरातील असलो तरी कंपनीचा व आमच्या ठेवीदारांचा विश्वासाला तडा जाऊ देत नाही, असे सांगितले. या मीटिंगसाठी जालना येथून देखील भरपूर मंडळी आली होती. मीटिंगमध्ये राजेंद्र भानुदास बरडे व त्यांच्या कुटुंबियांनी कॅपिटल ग्रोथ कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसा कसा वाढवता येतो, हे सांगितले. राजेंद्र बरडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे अक्षय तृतीयेच्या दिवशी अलोकनगर, सातारा परिसर येथे कॅपिटल ग्रोथ मार्केटिंग कंपनीचे ऑफिस सुरू केले.
त्या कार्यक्रमासाठीदेखील त्यांनी मुबारक आणि भरपूर लोकांना निमंत्रण दिले होते. मुबारक यांना गुंतवणूक केलेल्या २० हजार रुपयांचा परतावा मिळत होता. त्यामुळे त्यांचा बरडे कुटुंबावर विश्वास बसला. बरडे यांच्या कंपनीत मुबारक यांनी एकूण १६ लाख १७ हजार रुपये गुंतवणूक केली. काही दिवसांनी बरडे यांनी सांगितले की, माझा बिझनेस जास्त वाढला असून मला आता आठवड्याने परतावा देणे शक्य नाही. त्यामुळे मी तुम्हाला १६ महिन्यांनी मूळ रक्कम देईल व तो पर्यंत दर महिन्याचे साडेबारा टक्क्यांनी परतावा देतो, असे म्हणून काही चेकदेखील दिले. त्यासोबतच १६ महिन्यांनंतर मूळ रक्कम परत करेल, असे ॲग्रीमेंटदेखील करून दिले. सप्टेंबर २०२५ बरडे यांनी परतावा देणे बंद केले.
त्यामुळे मुबारक यांनी राजेंद्र बरडे यांना कॉल करून विचारले असता त्यांनी सांगितले की, काही टेक्निकल समस्या आल्यामुळे पैसे येण्यास थोडा विलंब होत आहे. तुम्ही काही काळजी करू नका. तुमचे सर्व पैसे सुरक्षित आहे मी लवकरच ते पैसे परत करतो. बरडे यांनी ठेवीदारांचा व्हॉट्स ॲप ग्रुप कॅपिटल ग्रोथ मार्केटिंग नावाने चालू केलेला होता. त्यात राजेंद्र बरडे व त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी हे सर्व लवकरच सर्वांना त्यांची रक्कम परत देण्यास सुरुवात करणार आहे, असे वेळोवेळी मेसेज टाकत होते. या ग्रुपमध्ये मुबारक यांच्यासह बरेच ठेवीदार होते. त्यात छत्रपती संभाजीनगर येथील प्रदीप कोळगे (गुंतवणूक रक्कम ३ लाख), कालिंदा कोळगे (गुंतवणूक रक्कम ८ लाख ९५ हजार), पांडुरंग म्हस्के (गुंतवणूक रक्कम ४ लाख १० हजार), तुषार गुप्ता (गुंतवणूक रक्कम १२ लाख), मीरा धावणे (गुंतवणूक रक्कम २ लाख २५ हजार), देविदास धावणे (गुंतवणूक रक्कम २ लाख ५४ हजार) यांचा समावेश होता. सर्वांचे मिळून ४४ लाख १ हजार ५५० रुपये गुंतवणूक झाली होती. अधिक तपास पोलीस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे करत आहेत.