- News
- उद्योग-व्यवसाय
- धक्कादायक : वाढत्या चोऱ्यांमुळे वाळूज MIDC तील हतबल उद्योजक उद्विग्न, म्हणाले, असं वाटतं, चोऱ्या माऱ...
धक्कादायक : वाढत्या चोऱ्यांमुळे वाळूज MIDC तील हतबल उद्योजक उद्विग्न, म्हणाले, असं वाटतं, चोऱ्या माऱ्या करूनच पोट भरावं, ना पोलीस पकडतात, ना कुणी दखल घेत...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तत्राच्या सौजन्याने) : वाळूज एमआयडीसीतील उद्योगांवर सलग चोरट्यांच्या धाडी घालणे सुरू आहेत. लाखो रुपयांचा मुद्देमाल लांबवला जात आहे. तरीही पोलिसांकडून ना तपास, ना घटनास्थळी पाहणी! उलट तपास सुरू आहे, हेच एकमेव उत्तर दिले जात असल्याने लघु उद्योजकांच्या सुरक्षेवर प्रचंड प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भोंडचे येथील रहिवासी व नारायण इंजिनिअर्स कंपनीचे (जी-३९, वाळूज एमआयडीसी) मालक प्रवीण नारायण दोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी रात्री कंपनीचे शटर उचकटून चोरट्यांनी १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. यात व्हीएमसी मशीनचे चेक, मिलिंग मशीन हेड, मोबाईल, कॅमेरा व १ ते २ टन रॉ मटेरिअलचा समावेश होता. मात्र, पोलिसांनी तब्बल आठ दिवसांनंतर गुन्हा दाखल केला आणि त्यात मुद्देमालाची किंमत जाणीवपूर्वक कमी दाखवून फक्त एक लाखाची नोंद केली, असा गंभीर आरोप उद्योजकांनी केला आहे.
पहिल्या प्रकरणाचा तपास ठप्प असतानाच १४ सप्टेंबर रोजी पहाटे ३.५० ते ४ वाजता पुन्हा या कंपनीवर चोरट्यांनी धाड घातली. तीन मजली इमारतीच्या गच्चीतून प्रवेश करून दरवाजा तोडत चोरट्यांनी तब्बल ४ लाखांचा रॉ मटेरिअल आणि लॅपटॉप मशीनचे व्ही-ब्लॉक सुटे पार्ट पळवले. दहा दिवस उलटूनही गुन्हा दाखल केला गेला नाही, तपासाची तर बातच नाही.
दोन वेळा कंपनी उद्ध्वस्त करून चोरटे निर्धास्त फिरत आहेत आणि पोलीस मात्र तक्रारीही नोंदवण्यास टाळाटाळ करत आहेत. संतप्त उद्योजक म्हणतात, की पोलीस निरीक्षक यांच्याकडे जातो मात्र त्यांना भेटायला व तक्रार ऐकून घ्यायला वेळच नाही, ठाण्यात जातो तर तक्रार घेतली जात नाही. अशीच परिस्थिती राहिली तर आत्महत्या करावी की काय, अशी वेळ आली आहे. असं वाटतं, की चोऱ्या माऱ्या करूनच पोट भरावं, ना पोलीस पकडत ना कुणी दखल घेत...
इतर कारखान्यांतही चोरी, तरी मौन!
नारायण इंजिनिअर्स व्यतिरिक्त एमआयडीसीतील आणखी दोन कारखान्यांमध्ये चोरीच्या घटना घडल्या असून त्यांचीही नोंद पोलीस ठाण्यात झालेली नाही, अशी माहिती समोर आली आहे.
ठाणे प्रमुखाचे एक, सत्य मात्र वेगळेच!
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणतात, मी आल्यापासून गुन्हे कमी झाले. पण प्रत्यक्षात तक्रारीच दाखल करून घेतल्या जात नसल्याने गुन्हे कमी झाल्याचे चित्र दाखवले जात आहे, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. लघु उद्योजकांच्या आयुष्यभराच्या कष्टाची कमाई लुटली जात असताना, पोलिस निष्क्रिय आणि बेफिकीर असल्याचे चित्र दिसत आहे. याकडे पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त पंकज अतुलकर व संजय सानप यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले आहे.

