- News
- पॉलिटिक्स
- ठाकरे गटाचं कट्टर हिंदुत्व संपल्यात जमा?; छत्रपती संभाजीनगरात मुस्लिम मतांसाठी धडपड, शरद पवार-काँग्...
ठाकरे गटाचं कट्टर हिंदुत्व संपल्यात जमा?; छत्रपती संभाजीनगरात मुस्लिम मतांसाठी धडपड, शरद पवार-काँग्रेसच्या संगतीत विचारही बदलत असल्याची चर्चा
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कधीकाळी कट्टर हिंदुत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या ठाकरे गटाची आजची भूमिका पाहिली तर कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. कट्टर हिंदुत्व ते धर्मनिरपेक्ष ही वाटचाल आश्चर्यजनक आहे. हा बदल कशामुळे झाला याचेही कारण लगेचच समोर येते. शरद पवार गट- काँग्रेस हे दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष म्हणून ओळखले जातात. त्यांच्या संगतीत ठाकरे गटानेही कट्टर हिंदुत्व […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कधीकाळी कट्टर हिंदुत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या ठाकरे गटाची आजची भूमिका पाहिली तर कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. कट्टर हिंदुत्व ते धर्मनिरपेक्ष ही वाटचाल आश्चर्यजनक आहे. हा बदल कशामुळे झाला याचेही कारण लगेचच समोर येते. शरद पवार गट- काँग्रेस हे दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष म्हणून ओळखले जातात. त्यांच्या संगतीत ठाकरे गटानेही कट्टर हिंदुत्व त्यागून हिंदुत्वाची नवी परिभाषा तयार केल्याची चर्चा आजघडीला होताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरातील दोन्ही उमेदवारांसाठी ठाकरे गटाला मुस्लिम मतांची गरज का भासते आणि त्यासाठी त्यांचे इतके आकाडतांडव का आहे, याचे कारण यात दडलेले आहे. शिंदे गट आणि भाजप कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करत असताना आणि हिंदुत्ववादी मते तिकडे वळतील, ही भीती असल्याने आता ठाकरे गटाचा मुस्लिम मतांकडे ओढा वाढला आहे. लोकसभेतही हा प्रयोग झाला आणि आता विधानसभेतही तोच कित्ता गिरवला जात आहे.
शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्ववादी विचारांना पुढे नेऊन वाटचाल सुरू केली आहे. भाजप हा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जातो. दोन्ही पक्षांनी हिंदुत्व निवडल्याने साहाजिकच हिंदुत्ववादी मतांचा ओढा त्यांच्याकडे वाढला. त्यात ठाकरे गटाने काँग्रेस-शरद पवार गटाशी आघाडी केल्याने विचारांतही हळूहळू परिवर्तन येत असल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी मुस्लिम बांधवांच्या भेटीगाठी, बैठका घेऊन ही मते पदरात पाडण्यासाठी प्रयत्न केले होते. आता पश्चिम आणि मध्य मतदारसंघाच्या उमेदवारांच्या विजयासाठी पुन्हा मुस्लिम मतांसाठी प्रयत्न केले जात आहेत. नोमाणी यांच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यशही मिळत असल्याचे चित्र आहे.
या विधानसभा निवडणुकीत विकासाचे मुद्दे कुठेच दिसत नाहीत. शहराचे अनेक प्रमुख प्रश्न प्रलंबित आहेत. त्या प्रश्नांवर चर्चा करालायही कुणाला वेळ नाही. सारेच प्रमुख पक्ष धार्मिक ध्रुवीकरणात व्यस्त आहेत. गेल्या ७ वर्षांत डीएमआयसीत तुरळक उद्योग येथे सुरू झाले आहेत. रोजगार वाढविण्यासाठी काय करणार हे कुणी सांगताना दिसत नाहीत. रस्ते, रेल्वे, सिंचन यावरही कुणी बोलताना दिसत नाही. त्यामुळे मतदारांत मात्र नाराजी वाढत चालली आहे. पाणीपुरवठा योजनेच्या तारखांवर तारखा दिल्या जात आहेत. प्रत्यक्षात शहरवासियांना या योजनेचे पाणी अद्याप मिळालेले नाही. छत्रपती संभाजीनगर राज्याची पर्यटन राजधानी आहे. पर्यटन विकासावर बरेच काही बोलण्यासारखे आहे. मात्र त्यावरही कुणी भाष्य करत नाही. मुलभूत समस्या सुटत नाही अन् धर्माच्या नावावर मते मागणाऱ्यांची संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे आता मतदारांनाच योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे.

