- News
- एक्सक्लुझिव्ह
- एक का कल्याण करता, दुसरे का बिस्मिल्ला… हे काय बोलले सत्तार, ज्यामुळे पुन्हा सिल्लोडमध्ये उफाळलाय व...
एक का कल्याण करता, दुसरे का बिस्मिल्ला… हे काय बोलले सत्तार, ज्यामुळे पुन्हा सिल्लोडमध्ये उफाळलाय वाद ; सत्तार-दानवेंतील वादात पुन्हा ठिणगी, बनकरांच्या सभांना भाजप पदाधिकाऱ्यांची हजेरी
सिल्लोड (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : एक का कल्याण (काँग्रेसचे खा. कल्याण काळे यांना) करता दिल्ली को भेजता, दुसरे का (भाजपचे माजी खा. रावसाहेब दानवे) बिस्मिल्ला करता भोकरदन मे बिठाता, अशी टीका पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर नाव न घेता केली. याबाबतचा एक व्हिडीओ रविवारी (२७ ऑक्टोबर) दुपारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर […]
सिल्लोड (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : एक का कल्याण (काँग्रेसचे खा. कल्याण काळे यांना) करता दिल्ली को भेजता, दुसरे का (भाजपचे माजी खा. रावसाहेब दानवे) बिस्मिल्ला करता भोकरदन मे बिठाता, अशी टीका पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर नाव न घेता केली.
शिवना येथे अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या लावणीच्या कार्यक्रमाला विरोध करत भाजप पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला होता. त्यावेळी भाजपच्या ३९ कार्यकर्त्यांविरुद्ध अजिंठा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या कारवाईच्या विरोधात भाजपने अजिंठा येथे रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनात बोलताना दानवे यांनी सिल्लोडचा पाकिस्तान होत असल्याचे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याविरोधात सिल्लोडमध्ये दानवेंविरुद्ध सत्तार समर्थकांनी मोर्चा काढला होता, तर भाजपनेही त्याला प्रत्युत्तर मोर्चाने दिले होते.
सुरेश बनकर ठाकरे गटाचे उमेदवार, पण फूस दानवेंची?
विधानसभा निवडणूक लढण्यास भाजपकडून सुरेश बनकर इच्छुक होते. मात्र ही जागा महायुतीत शिंदे गटाला गेल्याने त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करून उमेदवारीही मिळवली. मात्र यामागे रावसाहेब दानवे यांची खेळी असल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे. सत्तारांना कोणत्याही परिस्थिती पराभूत करण्यासाठी सध्या बनकर यांना पाठबळ पुरवले जात असून भाजपचे स्थानिक पदाधिकारी सत्तारांमागे नाहीतर बनकर यांच्यामागे असल्याचे चित्र वेगवेगळ्या गावांतही दिसून येत आहे. त्यामुळे सत्तारांच्या अडचणी वाढल्या आहेत. रावसाहेब दानवेंच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सिल्लोड आणि पैठणमध्ये भाजपचे स्थानिक पदाधिकारी शिंदे गटाच्या उमेदवाराविरुद्ध आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.
अंबादास दानवे म्हणाले, सत्तार नेहमीच गद्दारी करतात!
सिल्लोडजवळील भवन येथे रविवारी (२७ ऑक्टोबर) दुपारी ठाकरे गटाचा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना आ. अंबादास दानवे यांनी अब्दुल सत्तारांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की अब्दुल सत्तार हे कोणत्याही राजकीय पक्षाची गद्दारी करतात. त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेशी गद्दारी केली. काँग्रेस सोबतही गद्दारी केली. गद्दारांचा पराभव होणे महत्त्वाचे असल्याने सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सुरेश बनकर यांच्या हाती सोपवली आहे. पुन्हा एकदा उबाठा गटाचे सरकार महाराष्ट्रात स्थापन करण्यासाठी ताकदीनिशी मैदानात उतरून
विरोधकांना मात देणे गरजेचे आहे. यात कार्यकर्ते सर्वात महत्वाची भूमिका पार पाडतात, असेही ते म्हणाले. यावेळी विधानसभा संघटक रघुनाथ चव्हाण, उपजिल्हाप्रमुख विठ्ठल बदर, तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे, नगरसेवक मनोज मोरेलू, सरपंच उत्तम शिंदे आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे भाजपचेही काही पदाधिकारीही यावेळी उपस्थित असल्याने चर्चेला उधाण आले.

