- News
- जिल्हा न्यूज
- विधानसभा निवडणुकीत दोस्तीत कुस्ती!; विलास भुमरे, अनुराधा चव्हाण, रमेश बोरनारेंच्या विरोधात बंडखोरांन...
विधानसभा निवडणुकीत दोस्तीत कुस्ती!; विलास भुमरे, अनुराधा चव्हाण, रमेश बोरनारेंच्या विरोधात बंडखोरांनी रोवला झेंडा!!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना बंडखोरांचा सामना करावा लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. विलास भुमरे (पैठण), अनुराधा चव्हाण (फुलंब्री) आणि रमेश बोरनारे (वैजापूर) या उमेदवांची डोकेदुखी यामुळे वाढली आहे. पैठणमध्ये भाजपचे माजी तालुकाप्रमुख सुनील शिंदे, फुलंब्रीत शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश पवार तर वैजापूरमध्ये भाजप राज्य कार्यकारिणी […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना बंडखोरांचा सामना करावा लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. विलास भुमरे (पैठण), अनुराधा चव्हाण (फुलंब्री) आणि रमेश बोरनारे (वैजापूर) या उमेदवांची डोकेदुखी यामुळे वाढली आहे. पैठणमध्ये भाजपचे माजी तालुकाप्रमुख सुनील शिंदे, फुलंब्रीत शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश पवार तर वैजापूरमध्ये भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य एकनाथ जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत या बंडखोरांचे बंड शांत होते की अर्ज कायम ठेवून ते महायुतीच्या उमेदवाराचे मताधिक्य कमी करण्याचा प्रयत्न करतात हे पाहणे रोमांचक ठरणार आहे.
वैजापूर मतदारसंघात महायुतीत अलबेल नसल्याचे चित्र आहे. माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला अन् उमेदवारीही मिळवली. शिंदे गटाकडून आ. रमेश बोरनारे रिंगणात आहेत. जुन्या-नव्या शिवसैनिकांच्या लढाईत आता एकनाथ जाधव यांनी एंट्री घेतली आहे. त्यांनी २०१४ मध्ये भाजपाकडून वैजापूरमध्ये निवडणूक लढवली होती. त्यांना २४ हजार २४३ मते मिळाली होती.
पैठण मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार विलास भुमरे यांना विरोधकांपेक्षा स्वकियांचाच जास्त ताप झाला आहे. रावसाहेब दानवेंच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजप पदाधिकारी भुमरेंविरोधात आक्रमक झाले असतानाच, आता भाजपचे माजी तालुकाप्रमुख सुनील शिंदे यांनी थेट भुमरेंविरुद्ध अपक्ष म्हणून उमेदवारी अर्जच दाखल केला आहे. त्यामुळे सुनील शिंदे यांचे बंड कसे शमवले जाणार याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.
फुलंब्रीत भाजपच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांचे टेंशन शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश पवार यांनी वाढवले आहे. त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पैठणमध्ये विलास भुमरे आणि सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांची चिंता भाजप पदाधिकाऱ्यांनी वाढवली असताना फुलंब्रीत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने भाजपच्या उमेदवाराविरुद्ध बंडाचा झेंडा फडकवल्याने महायुतीतील सुंदोपसुंदी चर्चेत आली आहे. जालना लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचे काम न केल्याचा ठपका शिंदे गटावर भाजप पदाधिकाऱ्यांनी ठेवला आहे. त्याचा वचपा काढण्यासाठी सिल्लोड, पैठणमध्ये शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. त्याला फुलंब्रीत शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिल्याचे मानले जात आहे. वेळीच या गोष्टींना आवर घातला नाहीतर महायुतीला जिल्ह्यात नुकसान सोसावे लागू शकते, अशी चर्चा होत आहे.
प्रशांत बंब यांचा अर्ज दाखल…
गंगापूरमधून महायुतीचे उमेदवार प्रशांत बंब यांनी गुरुवारी शक्तीप्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही, तर वंचितने उमेदवार बदलून अनिल चंडालिया यांना उमेदवारी दिली आहे. ते लासूरस्टेशनचे आहेत. आ. सतीश चव्हाण हे प्रशांत बंब यांच्याविरोधात निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यांना शरद पवार गटातून उमेदवारी मिळणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी स्थानिक पदािधकाऱ्यांचा विरोध लक्षात घेता त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाते की ते अपक्ष लढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुलडाण्यात स्वगृहीत परलेल्या राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी मिळाल्याने सतीश चव्हाण यांनाही उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांतही नाराजी!
छत्रपती संभाजीनगरात महायुतीच्या कार्यकर्त्यांत समन्वय राहावा यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र या समितीत रिपाइंला स्थान नाही. त्यामुळे रिपाइंचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. रिपाइंचे शहराध्यक्ष नागराज गायकवाड यांनी याबद्दल पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. महायुतीच्या उमेदवारांचे काम करायचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांना विचारून घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे.

