- News
- सिटी क्राईम
- पाहून सुंदर ललना, इतका भाळला… ८ दिवसांत तिचं खरं रुप पाहून हादरा बसला!; लुटेरी दुल्हनसह ७ जणांविरुद्...
पाहून सुंदर ललना, इतका भाळला… ८ दिवसांत तिचं खरं रुप पाहून हादरा बसला!; लुटेरी दुल्हनसह ७ जणांविरुद्ध छत्रपती संभाजीनगरात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ती सुंदर ललना पाहून तो इतका भाळला की तिचं खरं रुप काही वेगळंच आहे हे त्याला कळलंच नाही… ८ दिवसांनी या लुटेरी दुल्हनचे खरे कारनामे समोर आले अन् त्याला धक्काच बसला. त्याने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी त्या ललनेसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कुसूम […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ती सुंदर ललना पाहून तो इतका भाळला की तिचं खरं रुप काही वेगळंच आहे हे त्याला कळलंच नाही… ८ दिवसांनी या लुटेरी दुल्हनचे खरे कारनामे समोर आले अन् त्याला धक्काच बसला. त्याने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी त्या ललनेसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुबेर गेवराई येथील हरिचंद्र अशोक कुबेर (वय ३३) याला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. नातेवाईक व मध्यस्थांमार्फत वधूचा शोध सुरू होता. गेल्या वर्षी मुळे नावाच्या व्यक्तीने कुबेर कुटुंबीयांची भेट घेतली. कुंडलिक चव्हाण व सूर्यनारायण (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याकडे एक मुलगी असल्याचे सांगितले. हरिचंद्र नातेवाइकांसह २६ मार्च २०२४ रोजी जोगेश्वरीत मुलगी पाहण्यासाठी गेला. रुपाने देखणी, लोभस मुलगी पाहून तो भाळला. मुलीची कथित आई मीरा गिरी हिने मुलीला वडील नसून कुंडलिक चव्हाण चुलते असल्याचे सांगून लग्नाची जबाबदारी त्यांच्यावर असल्याचे सांगितले होते.
आमची मुलगी सुंदर आहे. आम्ही हुंडा देणार नाही. तुम्हालाच लग्नासाठी ३ लाख रुपये द्यावे लागतील. त्यानंतर तुम्ही कुठेही लग्न लावा, असे मुलीची आई मीरा म्हणाली. त्यानंतर हरिचंद्रने ३ लाख रुपये देण्याची तयारी दाखवली. लग्न लग्न दुसऱ्याच दिवशी २७ मार्चला कुबेर गेवराईला लावण्याचे ठरले. आगाऊ ५० हजार रुपये दिले व उरलेले अडीच लाख रुपये लग्नात देण्याचे ठरले. करमाड येथे लग्नाचा बस्ता खरेदी झाली. दागिने खरेदी केल्यानंतर सायंकाळी सर्वजण कुबेर गेवराईला आले. हरिचंद्र व कुसूम यांचे लग्न लावण्यात आले. लग्नाचा विधी होताच हरिचंद्रचे चुलते पांडुरंग कुबेर यांनी कुंडलिक चव्हाण याला अडीच लाख रुपये दिले.
अशी ही बनवाबनवी…
लग्नानंतर हरिचंद्रने कुसूमचे आधारकार्ड पाहिले असता त्यावर कुसूम अजय चव्हाण (रा. वाटूर फाटा, ता. परतूर) असे होते. लग्नानंतर आठवडा होत नाही तोच ३ एप्रिलला कुसूमला तिच्या मामाने कॉल करून तुझे आजोबा आजारी असल्याचे सांगून त्यांना भेटण्यासाठी वाटूर फाटा येथे बोलावले. हरिचंद्र पत्नीसह दुचाकीने वाटूरला निघाला. त्याचवेळी कुसुमच्या मामाने पुन्हा कॉल करून कुसूमच्या चुलत भावाचे निधन झाले असून, राजूरला अंत्यविधी असल्याचे सांगितले व जालना येथे थांबण्यास सांगितले. त्यामुळे हरिचंद्र हा कुसूमला घेऊन जालन्यात थांबला.
काही वेळाताच कुसूमचा मामेसासरे आला. त्याने कुसूमला अंत्यविधीसाठी घेऊन जात असल्याचे सांगून तिला दुचाकीवर बसवून घेऊन गेला. नंतर कुसूम परतलीच नाही… लग्न जुळविणारा कुंडलिक चव्हाणही कॉल उचलेना… हरिचंद्र वाटूरला गेला असता तिथे कुसूम नावाची कोणतीच तरुणी ना कधी राहत होती, ना आता राहत असे सांगण्यात आल्याने हरिचंद्रला धक्काच बसला… मोठीच फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तडक वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे करीत आहेत.

